पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 राज्य बालहक्क आयोगाची पहिली वहिली जनसुनावणी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी शिरूर कासारमध्ये होती. युवती मेळाव्यात मुलींनी जिथं सर्वप्रथम मुठी आवळल्या होत्या, त्या मैदानाच्या बरोबर समोर! मांडवापासून विकतच्या पाण्यापर्यंत जय्यत तयारी झाली होती. उत्साहानं जमलेल्या मुलींनी हळूहळू मांडव भरून गेला. आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्यासह संतोष शिंदे आणि शालिनी कराड हे सदस्य वेळेवर पोहोचले. वेगवेगळ्या सरकारी खात्यांचे अधिकारी पोहोचले आणि सुरू झाला मुलींच्या दबलेल्या अंतःप्रेरणांचा जागर! भुवया उडवून डोळा मारणाऱ्या कोण्या एका केरळी मुलीच्या अदाकारीला जेव्हा यू-ट्यूबवर हजारो लाइक्स मिळत होते, त्याच वेळी इकडे या मुली ‘आम्हीच खराखुरा भारत आहोत,' असं ठासून सांगत होत्या. ही अदाकारी नव्हती. तडकफडक शब्दांमधून बाहेर पडणारं वर्षानुवर्षाचं सोसलेपण, साचलेपण होतं ते. एकोणतीस वर्षांच्या मुलासोबत पंधराव्या वर्षी लग्न लावून दिलेली मुलगी तिच्यावर गुदरलेले प्रसंग सांगत होती. प्लंबरच्या हाताखाली काम करणारा हा मुलगा बँकेत नोकरी करतो असं सांगून आपल्याला कसं फसवलं गेलं, हे ऐकवत होती. सासरच्या घरचं माप ओलांडण्यापूर्वी तिनं दहावीची परीक्षा दिली होती. नवरा २९ वर्षांचा. लग्न म्हणजे खरंच काय असतं हेही तिला ठाऊक नव्हतं. नवऱ्याशी बोलायलाही ती घाबरत होती आणि तिच्या सासरचे लोक नवऱ्याच्या खोलीत जाण्याचा आग्रह तिला करत होते. दहा दिवस ती नकार देत राहिली आणि या गुन्ह्यासाठी दररोज नवऱ्याचा आणि इतरांचा मारही खात राहिली.

 अखेर तिनं वडिलांना बोलावून घेतलं. 'मला घरी घेऊन जा, नाहीतर मी जिवाचं काहीतरी बरंवाईट करून घेईन,' अशी धमकी ही दिली. अखेर नागपंचमीच्या सणाचं निमित्त काढून वडील तिला न्यायला आले. माहेरी आल्यानंतर ती पुन्हा सासरी जायचं नाव काढेना. सगळ्यांनी दबाव आणला, मारझोड केली; पण ती बधली नाही. एके दिवशी तिचा नवरा आपल्या मित्राला सोबत घेऊन तिला न्यायला आला. तिनं नकार देताच नवऱ्यानं आणि मित्रानंही तिला खूप मारलं. त्यांनी दोन मोटारसायकली आणल्या होत्या. नवऱ्यानं तिला आपल्या मोटारसायकलवर घेतलं आणि नांदायला घेऊन जाऊ लागला. वाटेत चालत्या मोटारसायकलवरून तिनं उडी घेतली आणि शुद्धीवर आली ती हॉस्पिटलातच. तिथंही तिनं आपण नांदायला जाणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. उपचारांनंतर घरी गेल्यावरही सगळ्यांनी तिलाच दोष दिला. पाहुणेमंडळी सतत तिला टोचून बोलत राहिली; त्रास देत राहिली. दरम्यान, शिरूर कासारच्या युवती मेळाव्याचा बोर्ड तिनं

८७