पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुन्ह्यांची संख्या अधिक, पण नोंदी नाहीत. गुन्हा दाखल करायचाच असेल, तर कोर्टाचा हुकूम आणायचा आणि मगच पोलिस हालचाली करणार. अशा या भागात कोणत्याही कुटुंबात मुलगा जन्माला येणं आणि मुलगी जन्माला येणं, यात स्पष्टपणे फरक केला जाणं अपरिहार्यच ठरत असावं.

 मुलगा झाला, तर दहाव्या वर्षापासून तो कमावू लागतो. वाढंं गोळा करणं, मोळ्या बांधणं अशी कामं करण्यासाठी ठेकेदार त्याला ‘अर्धा कोयता' म्हणून कारखान्यावर नेतो. (एक दाम्पत्य म्हणजे एक कोयता.) मुली मात्र दहा-अकरा वर्षांच्या झाल्या की जिवाला घोरच! कारखान्याच्या हंगामासाठी स्थलांतर करताना मुलींना कुणाच्या भरवशावर सोडायचं? टोकाची असुरक्षितता! त्यामुळेच मुलीला ‘लोढणं' (लाएबिलिटी) मानलं जातं, हाच निष्कर्ष गोखले इन्स्टिट्यूटनंही काढला. अभ्यासांती लक्षात आलं की, मुली कमी असलेल्या या भागात मुली वाचवून त्यांची एक संपूर्ण फळी, संपूर्ण पिढी निर्माण करायला हवी, जी स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. या मुली परावलंबी नसतील. हीच इथली गरज आहे. पुरुषसत्ताकालाच आव्हान दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठीची कायमस्वरूपी व्यवस्था करायची असेल, तर स्वयंपूर्ण मुलींचीच फळी तयार करावी लागेल. कामाचं स्वरूप ठरू लागलं. आराखडे तयार होऊ लागले. यूएनएफपीएला प्रस्ताव गेला.

 व्हिलेज हेल्थ, सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी अर्थात ग्रामआरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती या नावाची एक यंत्रणा सरकारी कागदपत्रांवर दिसते. या समितीत दहा माणसं असतात. ग्रामसभेत निर्णय घेऊन ही समिती कायद्यानं अस्तित्वात येते. पण जेव्हा गाववार याद्या मिळवल्या तेव्हा दिसलं, अनेक ठिकाणी समिती अस्तित्वातच नाही. काही ठिकाणी समिती आहे; पण बैठकाच नाहीत. समितीच्या अनेक सदस्यांना आपण सदस्य आहोत, हेच माहिती नाही. या समित्या कार्यान्वित करणं गरजेचं होतं. बीड जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रं. तिथले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि परिचारिका अशी तीन माणसं निवडली. त्यातून जिल्ह्यासाठी १५० जणांची टीम तयार झाली. या टीमला प्रशिक्षण दिलं. त्यासाठी पुस्तिका तयार करून घेतल्या. प्रशिक्षणपूर्व आणि प्रशिक्षणोत्तर प्रश्नावली तयार केली. गावोगावी दाखवण्यासाठी दोन शॉर्टफिल्म्स दिल्या. मानधन, प्रमाणपत्र आणि सुविधा मिळत असल्यामुळे १५० जणांची फौज कार्यप्रवण झाली. १३५० गावांमधल्या १३५०० लोकांपर्यंत पोहोचणं, हे आमचं उद्दिष्ट होतं. प्रत्यक्षात बरेचजण ऊसतोडीला गेलेले असल्यामुळे १२५८० लोकांपर्यंत पोहोचता आलं. काही ठिकाणी बैठकांना आम्ही स्वतः जायचो. काही ठिकाणच्या तक्रारी यायच्या, त्या सोडवाव्या

३३