उद्योग वाढला. पैसा आला आणि मुख्य म्हणजे संसार सुरळीत चालू झाला. मुलींची शिक्षणं नीट मार्गी लागली. सोनं घरात आलं. चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. आता सिझनला तीन लाखाच्या वर त्यांची उलाढाल असते.
द्वारकाबाईंना जेव्हा विचारलं, 'तुम्हाला हे सगळं केल्यामुळे काय मिळालं?' - यावर त्यांचं उत्तर फार बोलकं आहे. त्या म्हणतात - 'माझा संसार सुखाचा झालाच पण मला हे दाखवून द्यायचं होतं की बाई कशातही कमी नसते. शिक्षण नसलं पर जिद्द असली तर बाई सगळं करू शकते.
***
उद्योगाचं रोपटं मोठं केलं १४
नाव - कल्पना बाबू बुचडे.
राहणार - बोरमाळ, शिवरे, ता. भोर, जि. पुणे.
शिक्षण - निरक्षर
वय - ४० वर्ष
व्यवसाय - केरसुण्या, दोरखंड वळणे
भारतीय संस्कृतीनं स्वच्छतेला, टापटिपीला फार महत्त्व दिलंय. त्यातूनच 'हात फिरे तिथे लक्ष्मी वसे' अशी म्हण रूढ झाली. याचंच एक रूप म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारी केरसुणीची पूजा.
कल्पनाताई आणि त्यांचे यजमान बाबू बुचडे हे पति-पत्नी मिळून प्रत्यक्ष लक्ष्मी वळण्याचं म्हणजेच केरसुण्या वळण्याचं काम करतात. कल्पनाताई बचतगटाच्या सदस्या आहेत. काम चालू करताना त्यांनी गटातून भांडवल म्हणून उचल घेतली. गटामुळे धंदा मोठा केला.
सरकारी योजनेचा लाभ -
थोडं भांडवल स्वत:चं उभं केलं आणि जोड म्हणून सरकारी योजनेचाही लाभ करून घेतला. त्याअंतर्गत बाबू बुचडे यांनी घायपाताची भोरहून खरेदी केली.
आता ही दोघं घायपातापासून दोर काढून दोरखंड वळतात, केरसुण्या वळतात. वाख काढतात. हा काढलेला वाख शोभवंत वस्तू करण्याच्या उद्योगाला विकतात. घायपात पाण्यात भिजवून, प्रक्रिया करून धागा