पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मुसलमान आधी या चळवळीबद्दल उदासीन होते आणि जेव्हा तिचे स्वरूप त्यांना जाणवले, तेव्हा त्यांनी आपल्या अधिकाराची भाषा सुरू केली. ही अधिकारांची मागणी करणारे मुस्लिम लीगचे नेतृत्व मुसलमानांत असलेल्या स्वत:च्या वेगळेपणाच्या जाणिवेचाच फायदा घेत होते. त्या आधीच्या मुसलमानांतील साऱ्या धार्मिक आणि राजकीय चळवळींची दिशा अशी या बंदिस्त मनाने ठरवून दिली होती. देवबंद येथील इस्लामी धर्मविचारांची चळवळही अशाच प्रकारच्या इस्लामच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून उगम पावली होती. ब्रिटिश सरकारविरुद्ध तिचा रोख होता, हे खरे; पण तिचा हेतू भारतात इस्लामी राज्य निर्माण करणे, हा होता. ब्रिटिशांनंतर ती हिंदूंविरुद्ध शस्त्र उगारणार, असाच याचा अर्थ होता.
 आधुनिक शिक्षणाने युक्त असलेले सारेच मुसलमान या विचाराचे प्रतिनिधित्व करीत नव्हते, हे खरे; परंतु जे करीत नव्हते, ते भौतिकवादाकडे आकर्षित होत होते. याचे कारण स्पष्ट आहे. धर्माचा त्याग केल्याखेरीज त्याला आधुनिकतेचा स्वीकारच करता येत नाही, अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे. सुशिक्षित मुसलमान हा एक तर परंपरागत धार्मिक विचारांतच गुरफटून राहतो किंवा त्याचा त्याग करून मोकळा होतो, या दोन एकांतिक टोकांकडे लंबकासारखा हेलकावे खात असतो. कारण धर्माचा आधुनिक अन्वयार्थ लावण्याची हिंमत तो करू शकत नाही. (धार्मिकतेचा आता नव्याने विचार केला पाहिजे, असे एका मुसलमान मित्राजवळ मी एकदा म्हणालो; तेव्हा त्याने मला ‘आहे त्याच्यापलीकडे विचार करायचा नाही, अशी कुराणाची आज्ञा असल्याचे उत्तर दिले!)

 हिंदू-मुसलमानांच्या संघर्षमय संबंधांचे हे एक कारण आहे. तथापि, त्याचबरोबर हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्याच्या पद्धतीने केलेला आघातही आपल्याला कमी लेखून चालणार नाही. धर्मांतर झालेल्याला बहिष्कृत केले गेल्याने, त्याच्याशी फटकून वागल्याने मुसलमानांच्या वृत्ती हिंदूविरोधी बनण्यास हातभार लागला आहे; कारण मुळात तो हिंदूच होता, बाहेरून येथे आला नव्हता. सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूहून त्याचे काहीच वेगळे नव्हते. हा वेगळेपणा निर्माण करावयास धार्मिक श्रेष्ठतेच्या कल्पनेने मुसलमानांनी जसा जाणूनबुजून प्रयत्न केला, तसाच हिंदूंनी आपल्या चातुर्वर्ण्याच्या पद्धतीने अजाणता का होईना फटकून वागण्याने केला. त्यामुळेच इथल्या मुसलमानी मनाची जडण-घडण ही केवळ खास मुसलमानी राहिलेली नाही; चातुर्वर्ण्याच्या संदर्भातील ती हिंदूविरोधी बनली आहे. जीनांनी या साऱ्याचा फायदा घेतला!

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ३५