पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्तही होऊ शकले. अतिरिक्त व्यक्तिस्वातंत्र्याने समाजाचा विचार करण्याची पात्रता ते गमावून बसले; परंतु त्याचबरोबर विचार करण्याची परंपरा ते निर्माण करू शकले. विचार करण्याची आणि वेगळे विचार ऐकून घेण्याची हिंदूमनाला गेल्या हजारो वर्षांची सवय आहे. त्यामुळे तटस्थपणे कठोर आत्मपरीक्षण करण्याची मनोवृत्ती त्यांच्यात निर्माण होऊ शकली. या इतिहासाकडे पाठ फिरवली पाहिजे, हे त्यांतील बहुसंख्य समजू शकले.
 मुस्लिम मनाला विचार करण्याचीच सवय नव्हती आणि नाही. 'किताबी मजहब' (Religion of Books) श्रेष्ठ असल्याच्या तथाकथित परंपरागत समजुतीत ते इतके गुरफटले गेले की, मुसलमानांचे जे-जे ते चांगले असाच त्यांचा समज होऊन बसला. हा समज अद्यापही कायम आहे. महंमद पैगंबराला फक्त सेमिटिक धर्मसंस्थापकांचीच माहिती होती. त्यामुळे त्याने 'त्या धर्मसंस्थापकांना पैगंबर माना', असे म्हटले. भारतातील धर्माची त्याला माहिती नव्हती, हे सर्व इतिहासकारांनी तर नमूद केलेच आहे; परंतु पैगंबराच्या काही चरित्रकारांनीदेखील मान्य केले आहे. उदा. : Ideal Prophet by Khaja Kamaloddin आणि योगायोगाने प्रत्यक्ष पराभव (भारतात) होऊ न शकल्यामुळे वैचारिक आवर्तने या समाजात निर्माण होऊ शकली नाहीत.
 आपल्याकडे राजकीय जागृतीचा काळ आला, तेव्हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात मुसलमान समाजाने प्रचंड प्रमाणात भाग घेतल्यामुळे तो भरडून निघाला होता. आधी आधुनिक शिक्षणाकडे त्याने पाठ फिरविली आणि मागाहून शिक्षण घेण्याची त्याला आवश्यकता वाटू लागली ती सर्व प्रकारच्या संधी हिंदू समाजाला लाभतील, या न्यूनगंडाच्या जाणिवेतून. आधुनिक शिक्षणाने मुसलमान समाजाचा हिंदू समाजाकडे पाहावयाचा मूलभूत दृष्टिकोन वास्तविक बदलायला हवा होता, परंतु तो बदलला नाही. एक प्रकारच्या घाईने घेतलेल्या शिक्षणाने निर्माण झालेली मुसलमानांची पहिली पिढी आधुनिक विचारांनी न भारावली जाता, नव्या लोकशाहीच्या (एक व्यक्ती : एक मत) जमान्यात कारभार हिंदूंच्या हातात जाणार, या विचाराने भयभीत झाली.

 वास्तविक, भयभीत होण्यासारखे काहीच नव्हते. किंबहुना, ती अगदी स्वाभाविक प्रक्रिया घडून येणार होती. एके काळी शासकाच्या मनोवृत्तीतून वागणूक देणाऱ्या मुसलमानांना हिंदूंच्याबरोबरच्या दर्जाची कल्पना मानवेनाशी झाली आणि मुसलमानांच्या राजकीय चळवळींची सुरवात ही अशी वेगळेपणाच्या मागण्यांची मुहूर्तमेढ ठरली. बहुसंख्यांक हिंदूंनी मुसलमानांच्या न्याय्य अधिकारांवर गदा आणली असती, असे समजण्यासारखी कोणतीही घटना घडलेली नव्हती. काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतातील सर्व जमातींना तिच्या आशा-आकांक्षांशी समरस करून घेण्याचे प्राथमिक प्रयोग काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होते.

३४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा