पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी त्यांना म्हणालो, “हे अत्याचार झालेच असले; तर ते माझ्या पूर्वजांवर झाले आहेत, तुमच्या नव्हेत. आणि म्हणून मी आता (नावाने का होईना) तुमच्यासमोर मुसलमान म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही मात्र हिंदूच आहात. माझ्या पूर्वजांवर झालेल्या अत्याचारांबद्दल आज या हिंदुत्ववादी मित्रांनी शोक करीत कशाला बसावे, हे मला कळलेले नाही."  अशाच टोकाचा दुसऱ्या प्रकारचा मूर्खपणा मुसलमान करीत असतात. "आम्ही भारतावर अमुक वर्षे राज्य केले" असे म्हणणाऱ्या मुसलमानाचा पूर्वज कदाचित आक्रमक मुसलमानांचा प्रतिकार करताना धारातीर्थी पतनही पावला असेल! कदाचित शूद्र म्हणून तो चातुर्वर्ण्याच्या नरकात तेव्हा पिचत राहिला असेल, कदाचित मुसलमान सत्ताधाऱ्यांनी त्याला 'हिंदू' असल्याबद्दल छळलेही असेल!
 इतिहासाच्या या वेगवेगळ्या अवस्थांतून होत गेलेल्या स्थित्यंतरांबद्दल आज आपण काय करणार आहोत? वास्तविक, आज मी मुसलमान असल्याबद्दल मला काही अभिमान वाटत नाही; त्याचबरोबर कसली खंत बाळगत बसण्याचेही मला काही कारण नाही. या स्थित्यंतराच्या अवस्था समजू शकणारी निरपेक्ष दृष्टी आता आपण सर्वांनीच धारण केली पाहिजे. ही दृष्टी न येण्याचे कारण या इतिहासातच आहे. सुमारे आठशे ते हजार वर्षांच्या मुसलमानांच्या राजवटीत भारतातील एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के एवढी लोकसंख्या मुसलमान झाली. अखेरी-अखेरीला तर केंद्रीय प्रबळ मुस्लिमसत्ता खिळखिळी झालेलीही पाहण्याचे त्यांच्या नशिबी आले... या काळात हिंदूंची (मी वेगळ्या अर्थाने येथे 'हिंदूंची' हा शब्दप्रयोग वापरला आहे.) राज्येही स्थापन होऊ शकली.
 मुसलमानांचे धर्मांतराचे जे जगव्याळ चक्र तेव्हा फिरत होते, ते भारतात मध्यवर्ती प्रबळ इस्लामी सत्ता दुबळी होताच थांबले गेले; आणि हिंदूची (अथवा या देशातील बहुसंख्य जनता असलेल्यांची, असे आपण म्हणू) प्रबळ मध्यवर्ती सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी भारतात पाय ठेवला. हिंदू-मुसलमानांच्या (सत्तांच्या) या ऐतिहासिक संघर्षाचा हा जो चमत्कारिक शेवट झाला, त्यामुळे दोन्ही जमातींतील काही गटांना वस्तुस्थितीचे आकलन झालेले नाही. ती वस्तुस्थिती हीच की, भारतातील मुस्लिम सत्ता हिंदू राज्यांनी दुबळी केली आणि पर्यायाने इस्लामीकरणाच्या प्रक्रियेला पायबंद घातला. हिंदू आणि मुसलमान या दोहोंनाही त्याचे नीटसे आकलन झालेले नाही.

 हा सारा प्रकार अप्रत्यक्षरीत्या झाला, हे याचे खरे कारण आहे. मुस्लिमसत्तेच्या वाढीचे चक्र (महाराष्ट्रातल्यासारख्या ठिकाणी) रोखले गेले; परंतु त्या सत्तेचा सरळ-सरळ पराभव झाला नाही.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ३२