पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणत्याही समाजाचे नेतृत्व सुशिक्षित वर्गच करत असतो. चळवळीच्या परिणामांची त्यानेच दखल घ्यायची असते. म्हणून, परिणामांची जबाबदारी त्याच्यावरच येते.
 परंतु, मुस्लिम नेतृत्वाचा हा सर्व कयास चुकीचा ठरला. हिंदूंनी दंगलीला दंगलींनी उत्तर दिले. नौखालीची किंमत बिहारमध्ये मुसलमानांना द्यावी लागली. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पश्चिम पाकिस्तानमध्ये झालेल्या दंगलीची तीव्र प्रतिक्रिया पूर्व पंजाब व दिल्लीच्या आसपास उमटली आणि त्या विभागातील सर्वच मुसलमानांना परागंदा व्हावे लागले. काश्मीरमधून पाकिस्तानी टोळीवाल्यांना आणि सैन्याला मागे रेटण्यास भारताने यश मिळवले. पाकिस्तानच्या नकाशात काश्मीरचा समावेश झाला नाही; होऊ शकला नाही! (अजून होत नाही.) हैदराबादमध्ये सैन्य पाठवून तेथील मुसलमानांचा भारतातील सामिलीकरणाला असलेला विरोध मोडून काढण्यात आला. पाकिस्तानकडून जुनागढ हिसकावून घेण्यात आले आणि वल्लभभाईंनी सर्व संस्थाने भारतात झपाट्याने सामील करून घेतली. भारत एकवटला गेला. हे फार झपाट्याने झाले. येथील मुस्लिम समाजाने ही अपेक्षा कधी केली नव्हती. त्याला या भारताच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेने जबरदस्त धक्का बसला!
 मुसलमान समाजाला या धक्क्यातून सावरायला काही काळ गेला. मुस्लिम समाजाच्या तेव्हाच्या आणि सध्याच्या मन:स्थितीचे गमक म्हणून अलिगढ विश्वविद्यालयाचे उदाहरण देता येण्यासारखे आहे. फाळणीच्या मागणीला पाठिंबा देऊन आम्ही आमचे भवितव्य येथील बहुजन समाजाच्या हाती दिले आहे, असे हतबल झालेला मुस्लिम समाज तेव्हा मानीत होता. अलिगढ विश्वविद्यालयाचे तेव्हाचे व्हाईस चान्सलर आणि मुस्लिम लीगचे उत्तर प्रदेशमधील एक नेते श्री. नबाब महंमद इस्माईलखान यांनी अलिगढ विद्यापीठाबाबत काय करायचे ते सरकारने करावे; हे विद्यापीठ सरकारला बंद करायचे असेल तर खुशाल करावे, असे नेहरूंना १९४७ मध्ये कळवले होते. परंतु १९६४ मध्ये तेथील विद्यार्थ्यांनी केलेल्या दंगलीमुळे विश्वविद्यालयाच्या कारभारात सुधारणा करण्याच्या हेतूने सरकारने टाकलेल्या पावलांविरुद्ध तेथील मुस्लिम समाजाने व नेत्यांनी गहजब गेला आणि सरकारला तसा अधिकार नाही, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा फरक कशामुळे घडला?

 खरे म्हणजे, मुस्लिम जातीयवादी प्रवृत्तीत काहीच फरक पडलेला नाही, याचे हे निदर्शक आहे. मुस्लिम जातीयवादी प्रवृत्ती काही काळ परिस्थितीच्या दडपणामुळे दबल्या गेल्या होत्या. त्या पुन्हा आस्ते-आस्ते संघटित झाल्या असून पुन्हा पूर्वीच्याच जोमाने आपले कार्य करू लागल्या आहेत.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । २७