पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमान वस्तीतूनच राहत असतो (इतर वस्तीतून त्याला सहजासहजी जागा मिळतही नाही.) आणि आपल्या मुलांवर शिक्षणाचे, चांगल्या वागणुकीचे संस्कार करावेत, असे त्याला वाटत असते. शिक्षणाचे महत्त्व आपल्याला (म्हणजे मुसलमानांना) कळत नाही, म्हणून तो हळहळत असतो. कधी स्वत:ला, आपल्या मुलांना इतरांपासून अलग ठेवण्याचा तो प्रयत्न करतो.
 परंतु, इतर सर्वसामान्य मुसलमानाला त्याची भीती वाटत नाही. तो मोहरमचा 'ताजा' तितक्याच उत्साहाने काढतो, गौसचे पंजे देहभान विसरून मिरवतो. सणासुदीला घरांना कसला तरी रंग फासतो. पैसे नसले तरी कर्ज काढून मुलांना नवी विजार आणि खमीस शिवतो. ईदच्या दिवशी गळ्यात रंगीबेरंगी रुमाल आणि कानात अत्तराचा फाया लावून आपल्या नातेवाइकांना व मित्रांना भर रस्त्यात 'ईद मुबारक' म्हणून कडकडून मिठी मारतो. धार्मिक सोहळ्याच्या या उत्साहात नागरी रीती-रिवाजांना फारसे महत्त्व द्यायच्या भानगडीत तो पडत नाही!
 भेंडी बाजार किंवा मदनपुरा अशांसारख्या वस्तींची तुलना न्यूयॉर्कमधील 'हार्लेम' या निग्रोंच्या वस्तींशी करता येणार नाही. हार्लेम हा अमेरिकेच्या सामाजिक जीवनाला मिळालेला शाप आहे. हार्लेममध्ये निग्रो मान ताठ करून चालतो. 'इथे माझी सत्ता चालेल', असे त्याच्या वागण्यातून प्रतीत होत असते. तोच निग्रो गोऱ्या वस्तीत एक प्रकारच्या न्यूनगंडाने पछाडला जातो. मुसलमान मात्र कुठेही मुसलमान असल्याच्याच भावनेने वागतो आणि भेंडी बाजारात त्याची मान अधिकच ताठ होते! कारण त्याच्या धार्मिक कडवेपणातच त्याचे व्यक्तिमत्त्व सामावलेले असते. अमेरिकेतील 'ब्लॅक मुस्लिम' या जहालवादी निग्रो पंथाच्या उदयाचे मूळ या वस्तुस्थितीतच शोधले पाहिजे.
 मुंबईतच आता एका विशिष्ट विभागांतच मुसलमान राहत नाहीत. मुंबईच्या वाढत्या पसाऱ्यात मुसलमान वस्त्यांची अनेक ठिगळे कानाकोपऱ्यांत निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी उभ्या राहिलेल्या गलिच्छ झोपडपट्ट्यांतील किमान अर्धे रहिवासी मुसलमान आहेत. मुसलमान समाजाच्या आर्थिक अवस्थेचे प्रतिबिंबच या वस्त्यांतून उमटून राहिलेले आहे.

 एके काळी कोकणी मुसलमानांची संख्या (मुसलमानांमध्ये) मुंबईत सर्वांत जास्त होती. भेंडी बाजारचा डोंगरी विभाग किंवा वांद्रयाची नौपाडा वस्ती त्यांच्या आता एके काळच्या वस्त्यांच्या खुणा म्हणूनच शिल्लक उरल्या आहेत. परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मुंबईत येऊ लागले, त्यांत परप्रांतीय मुसलमानही प्रचंड संख्येने येऊ लागले. बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात व मलबार येथून आलेल्या मुसलमानांचाच आता मुंबईत गजबजाट झाला आहे आणि कोकणातला अथवा महाराष्ट्रातील मुसलमान शोधूनही सापडणे मुश्कील झाले आहे; आणि जे राहत आहेत, ते स्वत:चा

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । १७