पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आल्या आणि त्यांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली. मी तिथून मागे वळलो आणि चालत ग्रँट रोडला परतलो.
 आता अठरा-एकोणीस वर्षांचा काळ लोटल्यानंतर हिंदू आणि मुसलमान वस्तीला अलग करणारी गोल देवळाजवळची ती निर्मनुष्य वस्तीची रेषा पुसली गेली आहे. मुंबईत गेली अठरा वर्षे तरी हिंदू-मुसलमानांचा दंगा झालेला नाही. पूर्वी हिंदू स्त्रिया ग्रँट रोडहून क्रॉफर्ड मार्केटकडे जाताना पायधुनीहून जाणाऱ्या १६ नंबरच्या ट्रामला बसत नसत, असे एका जुन्या ट्राम कंडक्टरने मला सांगितले. त्या स्त्रिया १० नंबरच्या ट्रामने जे. जे. इस्पितळापाशी येऊन दुसरी ट्राम पकडत असत. आता भेंडी बाजारच्या रस्त्यांतून त्या बिनदिक्कत वावरताना दिसतात.
 मुंबईतील मुसलमान वस्त्याही आता निर्भेळ मुसलमानांच्या राहिलेल्या नाहीत. पाकिस्तानला गेलेल्या अनेक मुसलमानांची स्थावर मालमत्ता पाकमधून आलेल्या निर्वासितांना दिली गेली. मांडवी पोस्टाकडून महंमदअली रोडने क्रॉफर्ड मार्केटकडे जाऊ लागलो की, काही इमारतींत आता सिंधी (हिंदू) राहताना दिसतात. परंतु यामुळे या मुसलमान वस्तीचा वेगळेपणा नष्ट झालेला नाही. या सिंधी हिंदूला आपण वेगळ्या वस्तीत राहतो आहोत, असे वाटत नाही. महंमदअली रोडवर राहणाऱ्या एका सिंधी हिंदूला मी मुसलमान असल्याचे बरेच दिवस माहीत नव्हते. परंतु, एक दिवस सहज बोलता-बोलता माझ्या मुसलमानत्वाचा पत्ता लागल्याने तो सद्गदित होऊन उद्गारला, “फिर तो तुम हमारे भाईही निकले!" बहुधा या त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीनेच या वस्तीचे स्वरूप कायम राहिले आहे.
 भेंडी बाजार हे मुसलमानांच्या राजकीय चळवळीचे एके काळी केंद्र होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटण्याचे कारण नाही. जीनांना मुसलमानांचे एकमुखी नेतृत्व भेंडी बाजारनेच मिळवून दिले. पाकिस्तानची चळवळ इथेच पोसली गेली, वाढली. या वस्तीतील मेमन, खोजा या धनिक, व्यापारी जमातींनी जीनांना पैशांचे पाठबळ पुरवले. हबीब बँक येथेच जन्माला आली आणि पुढे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकची राष्ट्रीय बँक बनली. इथल्याच केसरबागच्या मैदानावर द्विराष्ट्रवादाचा जीनांचा संदेश मुसलमानांनी ऐकला आणि कायदे आझम जीना जिंदाबाद' व 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांनी तेथील आसमंत एके काळी दणाणून गेला. पुढे होऊ घातलेल्या पाकिस्तानची भेंडी बाजार ही एक प्रकारे परक्या भूमीवरील (इन् एक्साइल) राजधानी होती!
 अनेक वर्षे राष्ट्रीय चळवळीत घालवलेल्या एका मुसलमान नेत्याने जीनांच्या केसरबागेतील एका सभेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाची कथा मला सांगितली होती.

 जीनांच्या सभांचा खाक्या नेहमी ठरलेला असे. सभेच्या व्यासपीठावर दोन्ही

१४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा