बोलणें प्रेमळपणानें ऐकून घेतात. आणि त्यांची योग्यता आपल्याला कळतें हें दाखवून देतात. पण हें सारें त्यांच्या भलेपणामुळे घडून येतें."
खुद्द बाईंनाहि इकडे आल्यामुळे फार आनंद झाला. त्या म्हणाल्या, "हें साल म्हणजे माझ्या दृष्टीनें मोठेंच घडामोडीचें गेलें. माझ्या जीवितांतील कार्यानंदाचा या सालीं अगदीं कळस झाला." हिंदुस्थानांतील निरनिराळ्या संस्था पाहून आपल्याला काय वाटलें हें त्यांनी पुढील वर्षाच्या आरंभीं सर लॉरेन्स यांना सांगितलें व त्या इंग्लंडला परत जावयास निघाल्या. टाऊन हॉलमध्यें मुंबईच्या लोकांनी त्यांचा शेवटचा सत्कार केला, सर लॉरेन्स यांना आपल्या कामाचा जो अहवाल त्यांनी सादर केला तो पुस्तकरूपानें इंग्लंडांत परत गेल्यावर त्यांनीं छापून काढला. तेथील हिंदु स्त्रीपुरुषांनी मोठा समारंभ करून बाईंना चहादाणीचें एक सुंदर तबक नजर केलें.
बाईंची लेखणीहि अव्याहत चाललेली होती. 'हिंदुस्थानांतले सहा महिने' या नांवाचे एक मोठें पुस्तक त्यांनीं लवकरच प्रसिद्ध केलें. तें त्यांनी राजा राममोहन रॉय यांना अर्पण केलें होतें. दोन्ही खंडांत झालेला बाईंचा लौकिक व्हिक्टोरिया राणीच्या कानीं गेलाच होता. म्हणून त्यांनी कार्पेटरबाईना राजवाड्यावर आपल्या भेटीला बोलावलें.
इकडे मुंबईत 'नॉर्मन स्कूल' नांवाची संस्था स्थापन करून हिंदुस्थान सरकारने दरसाल बारा हजार रुपये पांच वर्षेपर्यंत देण्याचें पत्करलें. आपल्याला हवी आहे तशी संस्था मुंबईला निघत आहे हें पाहून बाई पुन्हां हिंदुस्थानांत यावयास निघाल्या. त्यांच्या प्रवासाचा खर्च सरकारनेच सोसला.
येथें येतांच 'नॉर्मन स्कूलच्या व्यवस्थापिकेचें काम आपण पत्करावयास तयार आहों,' असें त्यांनीं सरकारला सांगितलें. सरकारनें ही जागा त्यांना खुषीनें दिली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, कार्पेंटरबाईची प्रकृति बिघडू लागली. त्यांना हिंदुस्थानांतील हवा मानवेना. म्हणून त्या लवकरच इंग्लंडला परत गेल्या. हिंदुस्थानांतील स्त्रीशिक्षणाचें काम पुढे ढकलावें म्हणून त्या पुन्हां हिंदुस्थानांत आल्या. परंतु सर्वच गोष्टींना नेहमीं अन्त असतो, या न्यायानें दुसऱ्यासाठी सतत श्रम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचाहि अंत झाला; आणि इंग्लंडांतील पोरक्या मुलांपासून तो हिंदुस्थानांतील अज्ञानी स्त्रियांपर्यंत सर्व निराश्रितांना आपल्या कर्तबगारीचा लाभ करून देणारी ही साध्वी कुमारी स्त्री लवकरच मरण पावली.
● ● ●