Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
कर्तबगार स्त्रिया
 


 इतके हाल होत होते, तरी तिनें आपले काम सोडलें नाहीं. खेडेगांवच्या लोकांत झारशाहीच्या विरुद्ध भावना उत्पन्न करणें, हें आपलें पहिलें काम आहे, असें तिनें ठरविलें होतें. पण बोलावयास जावें, तो शेतकरी म्हणत, "आमचे झारबाबा मोठे थोर आणि उमदे गृहस्थ आहेत. आम्ही त्याची लेकरेंच आहोत; आणि तो आमचा बाप आहे. आमचे हाल होतात, याला तो काय करणार? सरदार लोक हे अतिशय वाईट आहेत; हे उमराव आम्हांला सारखे छळत असतात आणि झारला जाऊन सांगतात कीं, जिकडे तिकडे अबादी- अबाद आहे, लोक तूप-साखर खात आहेत; आणि राज्याचा बंदोबस्त उत्तम आहे. आमच्या हालांची कहाणी झारच्या कानावर कधीं जातच नाहीं." लोकांच्या मनांतून हा गैरसमज काढून टाकणे फार कठीण जाऊं लागलें. झार स्वतः प्रजेकडे दुर्लक्ष करतो; आपण सुखांत राहतो; आणि कष्ट करणारांना छळणारे कायदे पास करतो, कोणी थोडी मान वर केली, कीं त्याला दडपून टाकण्यासाठीं आपलें प्यादें तो पाठवितो, हे कॅथरीनचे म्हणणे शेतकऱ्यांना आणि कामगारांना खरेंच वाटेना. झारचा दरबार कसा चालतो, आणि सामान्य लोकांची चालू असलेली दैना खुद्द झार स्वतः उघड्या डोळ्यांनी कशी पाहतो, या संबंधींची छापलेलीं पत्रके या लोकांना वाचून दाखवावीं, तर त्यांवरहि त्यांचा विश्वास बसेना. ते म्हणत, "कायद्याची पुस्तकें उमरावांनी तयार केलीं आहेत; आणि आमच्या रक्षणासाठीं झारबाबांनीं चांगल्या कायद्याचीं जीं पानें यांत घातलेलीं असत, तीं हे उमराव लोक फाडून टाकतात." अशा या लोकांचा भ्रम नाहींसा करणें मोठें कठीण काम होतें.
 तथापि 'मोझेस् आणि त्याचे चार भाऊ' अशा सारखीं कांहीं कांहीं पुस्तकें या लोकांना वाचून दाखविण्याचा क्रम कॅथरीननें चालू केला. आणि मग मात्र या अडाणी लोकांचे डोळे एकदमच उघडले. त्यांना कळून चुकलें कीं, अमीर उमराव आणि झार हे दोघेहि एकाच माळेचे मणी आहेत, सारे उडीद सारखेच काळे आहेत, काळे-गोरे म्हणून निवडावयास मुळींच जागा नाहीं. हळू हळू शेतकऱ्यांत आणि कामगारांत असंतोषाचें वारें फैलावूं लागलें. पण अजूनहि झारबाबावर श्रद्धा असलेल्या लोकांनीं कॅथरीनच्या या चळवळीची बातमी पोलिसांच्या कानावर घातली; आणि मग एके दिवशीं या लोकांच्या पुढें क्रांतिवाङ्मयाचें वाचन चालू असतां त्यांनीं कॅथरीनवर झडप घातली.
 क्रांतिकारकांची भीति झारच्या दरबाराला इतकी पडली होती, कीं या लोकांना शिक्षा द्यावयाची ती कंबर मोडेशीच दिली पाहिजे, असें दरबारनें ठरविलें होतें.