Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
कर्तबगार स्त्रिया
 


व्याप जातच नसे. नांगरणें, पाऊस पडणें, पेरा करणें, तण काढणें, पाणी देणें, कापणी करणें, मळणें, सावकाराला धान्य घालणें, सरकारी कर भरणें, आणि स्वतः वर्षभर जीविताचें कातडें कसेंतरी कुरतडत बसणें, एवढेंच शेतकऱ्यांचें जीवन असे. कॅथरीनच्या मनानें घेतलें कीं, रशियन शेतकऱ्यांना यांतून बाहेर काढलेंच पाहिजे. युद्ध सुरू झालें, म्हणजे झारबाबासाठीं मेलें पाहिजे; आणि युद्ध नसलें, म्हणजे झारबाबाच्या खजिन्यांत कर भरीत राहिलें पाहिजे, ही या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टांगलेली तलवार तोडून टाकली पाहिजे, असा तिच्या मनाचा निश्चय झाला.
 शेतावरची गुलामगिरी रशियाच्या झारनें रद्द केली होती हें खरें. शेतावर राबणारे लोक बंधमुक्त झाले, असें वर्तमान सर्व युरोपभर पसरलें; पण आपण बंधमुक्त झालों म्हणजे काय, याचें मर्म त्या जमीन कसणारांनाच फक्त कळून आलें! झारच्या फर्मानाचा परिणाम एवढाच झाला कीं, शेतावर राबत असतांना या लोकांना अर्धपोटीं राहावें लागत असें, तें आतां बंधमुक्त झाल्यावर त्यांना मुळींच खावयास मिळेनासें झालें! अमेरिकेतील बंधमुक्त निग्रोंची जी स्थिति झाली, तीच या राबणारांचीही झाली. जमीनदारांचा आणि यांचा कसलाही संबंध उरला नाहीं. अर्थात् जो थोडासा कुणगा त्यांना मिळावयाचा, तोही मिळेनासा झाला. शेतकरी सरकाराला म्हणू लागले कीं, 'आम्हांला तुम्ही मुक्त केलें असेल, पण आमची चंदीही तुम्ही बंद केलेली आहे; आम्हीं पोरांना काय आपली हाडें खाऊं घालावीं?' सरकारचे अधिकारी कोडगेपणानें उत्तर करीत, 'तें तुमचें तुम्ही पहा. तुमची गुलामगिरी नष्ट व्हावयास हवी होती, ती आम्हीं नष्ट केली आहे!'
 बेशकोवस्कीची शाळा चालूच होती; पण देशभर उडालेला हा हाहाःकार पाहून तिला वाटू लागलें कीं, क्रांति घडवून आणण्याला आपण योजत असलेला इलाज फार सौम्य आणि दिवसगतीचा आहे; हा उपाय जेथें पोंचावयास हवा, तेथें पोंचणार नाहीं. देशांत प्रचंड राज्यक्रांति झाली पाहिजे. ती झाली, तरच आर्थिक क्रांति होईल. आणि आर्थिक क्रांति झाली, तरच शेतकऱ्यांची दैना फिटेल. आतां राजकीय क्रांति करावयाची म्हणजे करावयाचें तरी काय? घडी हळू हळू बदलत न्यावी, इष्ट त्या सुधारणा घडवून आणाव्या, हा कार्यक्रम तिला बरोबर वाटे. राज्य- व्यवस्था आणि मग समाजव्यवस्था आमूलाग्र उलथून पाडावी, हें तिला अजूनही भावत नव्हतें. अशा काळांत एका सुधारणावादी क्रान्तिकारकाची व तिची गांठ