पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विश्वजितनं सांगितलेली हकिगत अत्यंत विचित्र होती. चारूचा बाप ईस्ट आफ्रिकेत व्यापारी होता. चारू बऱ्याच लहानपणापासून शिक्षणासाठी मुंबईला त्याच्या काकाकडे असे. त्याची काकू फार पैशाची लोभी आणि चमत्कारिक बाई होती. बाप त्याच्या नावानं भरपूर पैसे पाठवायचा. आणखी मागितले असते तरी ते त्यानं हसत पाठवले असते. पण त्यातला पैसा वाचवून स्वत:ची भर करायची म्हणून ती बाई चारूला अक्षरश: अर्धपोटी ठेवायची, जुनेपाने कपडे घालायला द्यायची. त्याच्यासाठी पाठवलेले नवे कपडे आपल्या मुलांच्या अंगात घालायची. कधी आजारी पडला तर त्याला धड औषधपाणीही करायची नाही. त्यानं घरी पत्र लिहिण्यासाठी एयरलेटर मागितलं तर ते महाग असत म्हणून द्यायची नाही आणि त्याच्या घरून आलेली पत्रं त्याच्या हातात पडू द्यायची नाही. काका तिचा कारस्थानीपणा न कळण्याइतका भोळा तरी होता किंवा तिला हातभार लावण्याइतका दुष्ट तरी होता.
 चारू प्रथमच जेव्हा सुट्टीसाठी परत गेला तेव्हा आपल्याला पुन्हा काकाकडे पाठवू नये म्हणून त्यानं जंगजंग पछाडलं, पण आईबापांनी त्याला दाद दिली नाही. त्यांना वाटलं ह्याची कल्पनाशक्ती जरा ओव्हरटाइम काम करते. असेल काकू थोडी रागीट, फटकळ स्वभावाची. पण त्याला उपाशी कशी ठेवेल, तसा चारू लहानपणापासून कल्पनाविलासात रमणारा आणि खऱ्याखोट्यात फार काटेकोरपणे फरक न करणारा होता, तेव्हा त्याचं सांगणं त्यांनी हसण्यावारी घालवलं.
 शेवटी तो म्हणाला, 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाही म्हणून तुम्ही माझे हाल होतील अशा ठिकाणी मला पाठवता. दादावर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही त्याला आपल्यापाशी ठेवून घेता.'
 त्याचा थोरला भाऊ पोलिओनं अपंग झालेला होता. पण हे कारण चारूला पटलं नाही. शेवटपर्यंत आपल्याला परत पाठवू नये म्हणून त्यानं आईबाबांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले, पण त्याच्या रडारडीचा झाला असला तर उलटाच परिणाम झाला.
 त्याचा बाप म्हणाला, मुलाच्या जातीला इतकं हळवं असून कसं चालेल जरा घट्ट व्हायला शिकलं पाहिजे. पुढं मोठा झालास म्हणजे कळेल आईबाबांनी केलं ते आपल्या चांगल्यासाठीच म्हणून.
 पण चारूला हे पटलं नाही. त्यानं आईबापांशी कायमचा संबंध तोडून टाकला. आफ्रिकेतली परिस्थिती अस्थिर झाल्यावर ते परत हिंदुस्थानात

कमळाची पानं । ९४