पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चारूला दुसरी नोकरी लागली नि विभानं त्याला आपल्याला दिवस गेल्याचं सांगितलं.
 तो म्हणाला, 'असं कसं झालं? आपण तर इतक्यात मूल नको म्हणून ठरवलं होतं.'
 'सगळी काळजी घेतली तरी अपघात नावाचा प्रकार असतो', ती हसत म्हणाली.
 तिचं न् चारूचं मुलाबद्दल बोलणं झालं होतं. तेव्हा तो म्हणाला होता, 'इतक्यात काय घाई आहे? अजून खूप दिवस मला तू नि तुला मी असं राहायचंय मला. तुला कोणाबरोबर शेअर करायचं नाहीये.'
 तरी तिची खात्री होती की मूल शक्यतेच्या पातळीवरून प्रत्यक्षात उतरलं की चारूला आनंद होणारच.
 पण तो म्हणाला, 'मग आता?'
 'आता काय? मूल होऊ द्यायचं अर्थातच. आपलं लग्न झालेलं आहे. तुला चांगली मोठ्या पगाराची नोकरी आहे. मूल होऊ न द्यायचं कारण आहे का काही?'
 तिचा स्वर जरा तिखटच आला तेव्हा चारू अजीजीनं म्हणाला, 'नाराज होऊ नकोस, विभा. मला आनंद झाला नाही असं नाही, पण मूल होणार म्हटल्यावर एकदम मोठी जबाबदारी पडते. ती पेलता येईल ना ह्याबद्दल शंका वाटते. एकदम दडपण आल्यासारखं होतं. नाहीतरी बायका जितक्या सहजतेनं मातृत्व स्विकारतात तितक्या सहजतेनं पुरुष पितृत्व स्वीकारू शकत नाहीत, नाही का?'
 चारूची नवी नोकरी एका मोठ्या खाजगी पोल्ट्रीत सेल-अँड-परचेस मॅनेजर म्हणून होती. पोल्ट्रीचा मालक एक सरदारजी होता.
 चारू म्हणाला, 'काहीही म्हण तू, पण उत्तर हिंदुस्थानी लोक दिलदार नि मोकळे असतात. त्यांना गुणांचं, श्रमाचं चीज असतं. आपल्या महाराष्ट्रीयांसारखे ते खत्रुड, मत्सरी, क्षुद्र नसतात.'
 विभा म्हणाली, 'तुझी सामान्य विधानं जाऊ देत. नोकरी आवडलीय ना तुला, मग तेवढं बास.'
 होऊ घातलेल्या मुलाबद्दल मात्र चारू काहीच बोलत नसे. फक्त बरंच मोठं डिपॉझिट भरून एक दोन बेडरूम्सचा फ्लॅट मात्र त्यानं घेतला.
 विभाला वाटे, चारूनं आपल्या बदलत्या शरीराची काही दखल घ्यावी,

कमळाची पानं । ८७