पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ते हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले आणि इतके दिवस ज्या ठामपणान तिनं पावलं टाकली होती ती एकदम डळमळल्यासारखं तिला वाटलं. हॉटेलच्या लहानशा खोलीत ती दोघंच, आणि बाहेर अंधारात बुडलेलं अनोळखी जग. आता आपलं संपूर्ण भवितव्य आपण ह्या माणसाच्या हातात सोपवलं आहे, आपल्या मनाचं, शरीराचं हा काय वाटेल ते करू शकतो, आपण त्याला मज्जाव करायला असमर्थ आहोत, अशी एक अगतिकतेची जाणीव तिला झाली. मी इतकी दुबळी नाही की नको असलेल्या आक्रमणाविरुद्ध झगडू शकणार नाही, हे एकीकडून कळत होतं. तरी पण भोवतालच्या वातावरणातून शोषून घेतलेल्या पारंपारिक स्त्रीत्वाच्या कल्पना कुठंतरी मूळ धरून बसलेल्या होत्या. काय बोलावं, काय करावं हे कळत नव्हतं. घसा कोरडा पडला होता. शेवटी ती दिवा घालवून आपल्या बिछान्यावर गुडघ्याभोवती हात गुंडाळून स्तब्ध बसली.'
 चारू मग तिच्याजवळ आला. त्यानं तिला मिठीत घेतलं, आवेगानं नव्हे, हळुवारपणे आणि तशाच हळुवार, किंचित दुखावलेल्या आवाजात तो म्हणाला 'विभा, माझ्यावर नेहमी माया करीत राहा. राहाशील ना? मला तुझ्या प्रेमाची फार गरज आहे गं. माझ्यावर आतापर्यंत कुणी प्रेम केलंच नाही, मला कुणी समजून घेतलंच नाही. तू घेशील ना?'<बर> विभाचं हृदय भरून आलं. तिनं त्याला आवेगानं जवळ ओढलं.

० ० ०

 विभा म्हणाली, 'आम्ही परत आलो. नि मला कळलं की चारूशी लग्न म्हणजे तुझ्याशी गाठ. सासूसासरे नसले तरी त्यांची उणीव भरून काढायला तू समर्थ होतास.'
 'मी काय सासुरवास केला गं तुला?'
 'तसा उघडपणे नाही, पण तू ज्या काकदृष्टीनं माझ्या संसाराची पाहाणी केलीस ती हेच दर्शवत नव्हती? चारूला बऱ्या बोलानं नीट सांभाळ, नाहीतर मला जाब द्यावा लागेल असा निरोप माझ्यापर्यंत पोचेल असं वागत होतास तू. मान हलवू नको. त्यावेळी तुझी सारवासारव ऐकून घेतली मी, पण मी म्हणतेय ते खरं नसतं तर मग आज तरी तू इथे कशाला आलायस?'

० ० ०
कमळाची पानं । ८२