पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अचानक अनोळखी माणसांची घरातली वर्दळ वाढली. लोकांची बोलणी व्हायला लागली. तिला विश्वासात न घेता बरंच काही शिजू लागलं. तेव्हा तिला घाबरल्यासारखं झालं.
 'तुमी असं नाय करू शकनार. तुमाला तुरुंगात टाकतील.' तिनं निकराचा प्रयत्न केला, श्रीपतीचं दुसरं लग्न टाळण्यासाठी.
 'अगं ये ऽ जा गं तुरुंगवाली. माजा शिरपा पोलिसात हाये म्हन्ल.'
 'तुमी म्हन्ला म्हनून त्ये न्हाई लगीन करायचे लगीच.'
 'अगं बघशीलच रंडके कोन लगीन करतं ते. आन् तू त्वांड बंद ठेव. नाहीतं म्याच ठार मारीन तुला. मग शिरपतीला येवस्थेशीर दुसरं लगीन करता यील.'
 श्रीपती खरंच लग्नाला तयार झाला. आणि राधानं घर सोडलं. घरच्यांनीही तिची फारशी फिकीर केली नाही. ती तालुक्याला, सोनगावला गेली आणि शेतावर राबून आयुष्य कंठायला लागली.
 ती दररोज वस्तीवरच्या भैरोबाच्या देवळात जायची. श्रीपतीला आणि आपल्या सासूला देवानं शिक्षा द्यावी म्हणून नवस बोलायची, कौल लावायची.
 वस्तीवर ती म्हणजे सगळ्यांच्या करमणुकीचा विषय झाली होती. थोडीशी कुणी सुरुवात करून देताच ती आपल्या आयुष्याच्या कर्मकहाणीचं नाटक वर्णन करू लागायची. तिचा बोलताना उफाळून येणारा संताप आणि शेलक्या शिव्यांची पेरणी यामुळे आजूबाजूच्या लोकांचा वेळ मजेत जायचा. ते तिला 'वेडी' म्हणायचे आणि चिडवत राहायचे.
 'शिरपती इतं आला तर तू काय करशील ग त्याचं? त्याचं टुकड भाकरीबरूबर खाशील का?'
 'त्याला खाल्लं तर ईख भिनल माज्या आंगात.'
 'मंग काय करशील तू? बैलाच्या चाबकानं फोड़न काढशील का गं?'
 'तुमी त्येला घिऊन तर या हिकडं. मंग बगा मी काय करत्ये त्ये.'
 सुरुवातीला तिला असं काही बोलल्यावर बरं वाटायचं. पण लोकांकडून फक्त जरा हसायला मिळावं म्हणून वापरलं जाण्याचाही तिला कंटाळा येऊ लागला. तिनं त्या प्रकाराबद्दल उघडपणे बोलायचं सोडून दिलं.
 वरवर संथ दिसणारा तिचा आयुष्यक्रम सुरू होता. पण तिच्या मनातला त्वेष, संताप, द्वेष आता मोकळी वाट नसल्यानं कोंडून राहायला लागला त्यामुळे तो अधिकाधिकच उग्र रूप धारण करायला लागला.

कमळाची पानं । ७४