पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रात्री जेवताना बिछूनं विचारलं, 'कशी काय वाटली तुला सरिता?'
 एव्हाना मी तटबंदी उभारून ठेवलेली होती. मी म्हटलं, 'छान आहे.' बस, एवढंच! असल्या लढाईतले डावपेच मी शिकत होते.
 'मी तिच्याशी लग्न करणार आहे असं सांगितलं तर तू काय म्हणशील?'
 मला एकदम चकित करणारी बातमी सांगण्याच्या आविर्भावात त्यानं विचारलं.
 'मी म्हणेन की थोडा थांब. जिच्याबद्दल आदर वाटू शकेल अशी मुलगी आहे अशी खात्री कर, आणि मग खुशाल तिच्याशी लग्न कर.'
 'आमची ओळख काही आजची नाहीये. खात्री होण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही.' जरा थांबून माझ्याकडे न बघता तो म्हणाला, 'मला माहीत आहे तिला काही महत्त्वाकांक्षा नाही हे तुला आवडलेलं नाही. पण प्रत्येकजण काही तुझ्याइतकं बुद्धिमान नसतं. आणि शेवटी आमचं एकमेकांवर पुरेसं प्रेम आहे की नाही ह्याला महत्त्व आहे, अितर कशाला नाही.'
 मी काहीच बोलले नाही. दोन-चार घास खाऊन तो म्हणाला, 'आम्हांला शक्य तितक्या लवकर लग्न करायचंय.'
 'शक्य तितकं म्हणजे किती लवकर?' मी विचारलं.
 'डिसेंबरमध्ये. तेव्हा तिचे आई-वडील इकडे येणार आहेत. ते आफ्रिकेत असतात.'
 'पण तुझं अजून शिक्षण संपायचंय. ते संपेपर्यंत तरी थांबायला काय हरकत आहे?'
 'असं आहे, एकदा सगळं ठरवल्यानंतर मग थांबण्यात तरी काय अर्थ आहे?'
 एक अर्थ असा, की शिक्षण संपवून मिळवायला लागल्यावर त्याला बायको पोसता येईल. त्यांना दोघांनाही मी पोसावं-कदाचित आणखी कित्येक वर्ष-अशी अपेक्षा करण्याइतका बिछू बेजबाबदार आहे? स्वत:च्या पायांवर उभं राहायला येईपर्यंतसुद्धा थांबवत नाही इतका अगतिक बनला आहे?
 पण हे सगळं रागारागानं बोलून दाखवण्याचं समाधान मला लाभणार नव्हतं. ते माझ्या नव्या डावपेचात बसलं नसतं. असले डावपेच आमच्या दोघांच्या नात्यात कधीच आले नव्हते. ते आता आमच्या नात्याचा आवश्यक भाग बनणार होते. वर्षानुवर्षं स्थिर असलेलं नातं त्यात तिसऱ्या एकाचा प्रवेश होऊन इतकं बदलू शकतं?
 या दोघांसाठी मी नोकरी करायची, घर चालवायचं, आणि मनातलं खरं

कमळाची पानं । ५३