वळणं
जगदीश आणि मी मूर्खासारखे भांडलो.
म्हणजे भांडण हेच मुळात मूर्खपणाचं असतं
असं नव्हे. गरज भासली तर किंवा
भांडण्यातून काही निष्पन्न होणार असलं तर
भांडावं, पण आमच्या संबंधात भांडण बसत
नव्हतं. तेव्हा तसं पाहता ते निरर्थक होतं.
बऱ्याच वर्षांपूर्वी आमचा समझोता झाला
होता. त्यानंतर पहिल्यापहिल्याने आम्ही
अगदी तोलूनमापून अन् शिष्टाचाराच्या
कल्पनांना घट्ट धरून वागत होतो. म्हणजे
आहे ही परिस्थिती कायमची म्हणून
स्वीकारीत नव्हतो, ह्यातून काही पर्याय
निघेल अशी आशा बाळगून होतो. मग
हळूहळू ह्याचं रूपांतर एका खेळीमेळीच्या,
मैत्रीच्या संबंधात झालं. ह्याचाच अर्थ आमचं
जे काय नातं होतं ते संपलं, तुटलं असं
आम्ही मान्य केलं आणि आता इतक्या
वर्षांनी एकदम हे भांडण झालं.
त्या दिवशी सकाळी लॅबमध्ये आल्याआल्याच
त्यानं भेटायला बोलावलंय म्हणून निरोप
मिळाला. त्याच्या ऑफिसात गेले तेव्हा तो
तोंडभर हसून म्हणाला, 'प्रवासाच्या
तयारीला लाग.'