पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी दार उघडलंय आणि तो समोर उभा आहे, इथंच माझी प्रतिभा लुळी पडत असे, म्हणजे 'कसं काय-ठीक आहे'च्या गद्य पातळीवरच अडकून बसत असे.
 पण खऱ्या आयुष्यात नरेंद्र नसताना शेखर कधीच येत नसे. गावाला जायचं असलं म्हणजे नरेंद्र तसं आधी सांगायचा, आणि शेखरची पुढची भेट नरेंद्र परत आलेला असेल अशा बेताने व्हायची. कधीकधी असं कां असा प्रश्न मला पडायचा. कदाचित् शेखरचं वागणं-बोलणं नुसतं वरवरचं असेल, आणि . नरेंद्र नसताना माझ्या सहवासात वेळ घालवण्यानं नरेंद्रबद्दल आपल्या निष्ठेला धक्का लागतो असं त्याला वाटत असेल.
 कधीकधी विचार करायला लागले की मला शेखर आणि नरेंद्रची इतकी दाट मैत्री झालीच कशी ह्याचं आश्चर्य वाटायचं. नरेंद्र निर्बुद्ध खास नाही, तरी पण त्याच्या बुद्धीला निश्चित मर्यादा आहेत नि त्याचा सहवास शेखरच्या प्रगल्भ बुद्धीला उत्तेजक वाटण्याची शक्यता फारच कमी. उलट आपण नरेंद्रपेक्षा वरचढ आहोत असं दाखवण्यात शेखरला काही आनंद वाटत होता असंही मला कधी दिसलं नाही. म्हणजे त्यांच्या मैत्रीचं सवय हेच एक कारण राहिलं शिवाय एखाद्या कलंदरालासुद्धा आयुष्यात काहीतरी धर हवा असतो. ही गरज शेखरच्या बाबतीत नरेंद्रानं पुरी केली असेल.
 एक दिवस अचानक शेखरनं आम्हाला तो मुंबई सोडून कलकत्त्याला जाणार अशी बातमी देऊन हादरवलं.
 मी म्हटलं, "कलकत्ता? त्या घाणेरड्या शहरात एखादा आपणहून जातो?"
 "एखाद्याला नोकरी मिळाली म्हणजे जातो," तो म्हणाला.
 बापानं ठेवलेल्या इस्टेटीतून शेखरला काही थोडं उत्पन्न मिळत होतं. फावल्या वेळात वर्तमानपत्रं, मासिकं यासाठी नैमित्तिक लिखाण करीत असे. नोकरी करण्याची त्याला गरज नव्हती आणि करावी असं त्याला कधी वाटलं नव्हतं. आता एकाएकी त्यानं ठरवलं की लहर लागेल तेव्हा काम करण पुरेसं नाही.
 तो म्हणाला, "का कुणास ठाऊक, पण कुणीतरी डोक्यावर बसल्याखेरीज स्वत:च्या कार्यशक्तीचा पुरेपूर उपयोग करून घेत नाही आपण."
 नरेंद्र म्हणाला, "ते सगळं ठीक आहे रे. पण स्वतंत्र आयुष्य जगायची सवय झाल्यावर नोकरीचं बंधन तुला आवडणार नाही."
 "कदाचित् नाहीही आवडायचं, पण ते कसं वाटतं ते पाहायचंय मला"

कमळाची पानं । ३६