पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "खरं म्हणजे त्यांच्या आधाराने मला राहायचं नव्हतं. तसा आमचा समेट झाला होता, आणि मी दोन-तीनदा भेटूनही गेले होते त्यांना. तरी अशा परिस्थितीत त्यांनी मला काय ऐकवलं असतं मला माहीत होतं. ते मला अपमानास्पद वाटलं असतं. मला गरज होती ती भावनिक आधाराची, आणि तो ते देऊ शकले नसते. झालं ते काही वाईट झालं नाही. पण तो सुरुवातीचा काळ मला फार खडतर गेला. नशिबाची गोष्ट म्हणजे फेलोशिप संपण्याच्या काळात मला एक नोकरीची ऑफर मिळाली."
 ह्यात नशिबाचा भाग फारसा नव्हता हे न कळण्याइतकी ती भोळी होती असं मला वाटलं नसतं. मुळात एका कॉन्फरन्समधे भेटलेल्या एका प्रोफेसरने सुचवल्यावरून तिने फेलोशिपसाठी अर्ज केला होता. आणि तिकडे शिकणाऱ्या, संशोधन करणाऱ्या चांगल्या विद्यार्थ्यांना हेरून नोकऱ्या देऊ करायच्या हा अमेरिकनांचा कावा सर्वश्रुत आहे. हे सगळं तिला माहीत नव्हतं ह्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण तिने आपल्या आयुष्यातल्या घटनांची एक विशिष्ट संगती लावली होती जी तिला सर्वात जास्त स्वीकार्य वाटत होती.
 "मला लागलेली नोकरी सरकारच्या शिक्षण खात्यात होती, त्यामुळे माझ्या नागरिकत्वाचा मार्ग सुकर झाला. मग मी मुलांनाही बोलावून घेतलं. आता ते दोघे तिथेच आहेत."
 "तुला कधीच हा निर्णय घेतल्याचा पश्चाताप झाला नाही?"
 "छे:, मिनिटभर सुद्धा नाही. तू काहीही म्हण, But that's the land of opportunity. मी कोण-कुठली, पण केवळ गुणवत्तेच्या आधारावर मला तिथे ज्या संधी मिळत गेल्या तशा इथे काही मिळाल्या नसत्या."
 "असं का म्हणतेस? इथेही तुला चांगल्या संधी मिळत गेल्याच की. त्यातूनच तुला ही फेलोशिप मिळाली."
 ती काही बोलली नाही. नुसते खांदे उडवलेन. खरं म्हणजे ती तिच्या वैयक्तिक समस्येपासून पळून जाऊन तिकडे स्थायिक झाली होती. पण त्या देशाची सर्व बाबतींत भलावण करून तिला आपल्या निर्णयाचं समर्थन करण्याची गरज का भासत होती? तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून सत्यशीलवर प्रेम केलं होतं. घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी लग्न केलं होतं. त्या लग्नाचा असा शेवट होईल हे स्वीकारायलाच तिचं मन तयार नव्हतं. अशा स्थितीत तिनं परत इकडे न येण्याचा निर्णय घेतला. एवढं पुरे होतं.
 एक दिवस मी तिला विचारलं, "तुला इकडची कधी चरचरून आठवण

कमळाची पानं । १५४