पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुन्हा कधी तिच्या घरी मला जायचा प्रसंग आला नाही. एम्. ए.ची परीक्षा संपली. तिच्या आईवडिलांना कुठून तरी सत्यशीलबद्दल सुगावा लागला. तिला छेडल्यावर तिनं ते कबूल केलं, आणि मोठा स्फोट झाला. तिच्या आईला हार्ट अटॅक आला. वडिलांनी विमलाला घरात डांबून ठेवलं, आणि दोन महिन्यांनी, 'त्या'ला भेटणार नाही अशा कबुलीवर रिझल्ट घ्यायला तिला पुण्याला येऊ दिलं. काय करावं ते तिला समजत नव्हतं. पण सत्यशीलशी लग्न करायचं नक्कीच असलं तर परत घरी जाणं ही घोडचूक ठरेल असं तिला मनोमन वाटत होतं. मी म्हटलं, "तू माझ्या घरी चल. आईशी बोल. ती काहीतरी मार्ग काढील."
 आईनं तिला विचारलं, "सत्यशीलची तुला खात्री आहे का? तशीच वेळ आली तर तो तुझ्याशी लगेच लग्न करील का? तो नाही म्हणाला तर तू दोन डगरींच्या मधे पडशील. नाही तर असं कर. त्याला घेऊन ये मला भेटायला."
 "पण मी आत्ता लग्न केलं आणि आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही."
 "तिला हार्ट अटॅक आला म्हणजे नेमकं काय झालं?"
 "एकदम छातीत दुखायला लागलं म्हणाली. डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी औषधं लिहून दिली. विश्रांती घ्या म्हणाले."
 "एवढंच? हॉस्पिटलमधे सुद्धा नेलं नाही? काही चाचण्या वगैर केल्या नाहीत? मग तो हार्ट अटॅक नव्हताच मुळी. काही होणार नाही तुझ्या आईला. मुलांना आपल्या मनासारखं वागायला लावायसाठी युक्त्या असतात ह्या."
 विमलाचं लग्न आमच्या घरी झालं. सत्यशीलची आई आणि बहीण मुंबईहून आल्या (वडिलांचा संबंध नव्हता कारण त्यांनी ह्या बायकोला सोडून दिलं होतं) त्यांनी घाईघाईने खरेदी केलेली साडी, दोन दागिने विमलाच्या अंगावर घातले. कुठून तरी एक भटजी बोलावला.
 बायकांच्या मैत्रीला लग्नाचा शाप असतो. ती आणि सत्यशील मुंबईला गेले, तिथून त्याला कलकत्त्याच्या एका कंपनीत नोकरी मिळाली तिकडे. वर्षातनं एकदा एकमेकींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या त्यावेळी एकमेकींच्या आयुष्यातल्या घडामोडी कळत गेल्या. पुढे ती अमेरिकेला गेली आणि आमच्यातला उरलासुरला धागा तुटला. मला नाही वाटत आमच्यातल्या कुणी त्याबद्दल अश्रू ढाळले म्हणून. आणि आता एकदम हे पत्र.
 "मी भारतात येते आहे. मुख्यत: जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला. तुझी

कमळाची पानं । १५०