Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अचिकित्सक प्रती उपलब्ध आहेत त्यापैकी कोणती तरी एक आधारासाठी घेणे व कथानकाचे दुवे तेथून घेऊन विवेचनाची मूल्ये ही मात्र आधुनिक ठेवणे अशी एक अभ्यासाची पद्धत आहे. या पद्धतीत तत्त्वतः मला चुकीचे असे काही वाटत नाही. कारण महाभारताची नीलकंठी प्रतीसारखी अचिकित्सक प्रत जरी घेतली किंवा इतर कोणतीही प्रत घेतली तरी ती प्रत संस्कृतीला मान्य असणारी महाभारताची कथा सांगते. महाभारत हा आधुनिक अर्थाने इतिसाहाचा ग्रंथ कधीच नव्हता. ती शेवटी धार्मिक संस्कृतीला कैक शतके मान्य झालेली धर्ममान्यतेची परंपरा असलेली अशी वाङमयकृती आहे. परंपरेने जर एखादे कथानक आपल्या हाती दिले तर या कथेत कलावंताने स्वतःचे अपेक्षित रंग भरण्यास काहीच हरकत नाही. नेहमीच अशा परंपरेच्या कहाण्या- प्रचारासाठी, तत्त्वबोधासाठी, मनोरंजनासाठी वापरल्या गेलेल्या आहेत. किर्लोस्कर, खाडिलकरांनीही हे केलेले आहे. आधुनिकांनी निदान असलेल्या कथांचा आपल्याला जाणवणारा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मश्रद्ध प्राचीनांनी तर महाभारतात नसलेल्या कथा भारतीय व्यक्तीची निंदा करतील याची क्षिती न बाळगता भक्तिभावाने सांगितलेल्या आहेत व मिटक्या मारीत वाचलेल्या आहेत. जांभुळाच्या आख्यानाच्या निमित्ताने द्रौपदीची, चंद्रावळी आख्यानाच्या निमित्ताने कृष्णाची जशी विटंबना धामिकांनी केलेली आहे तसे अजून आधुनिकांनी केलेले नाही.
 संस्कृतीला मान्य असणारी कहाणी म्हणून महाभारत पाहण्याचा हक्क आपण सर्वांनीच मान्य केला पाहिजे. मात्र हा हक्क बजावीत असताना नसत्या भानगडीत लेखकांनी पडू नये अशी अपेक्षा आहे. नसत्या भानगडी म्हणजे दोन : एक भांडारकर संशोधन संस्थेने जी चिकित्सक आवृत्ती सिद्ध केलेली आहे तिच्याशी संघर्ष घेण्याची कोणतीही गरज नाही. दुसरे म्हणजे, आपण जे म्हणतो तो इतिहास आहे किंवा ते व्यासाचे मनोगत आहे असा आव आणण्याची काहीच गरज नाही. कारण महाभारताची चिकित्सक आवृत्ती म्हणजेसद्धा इतिहास नव्हे. व्यास होता की नाही आणि असल्यास त्याचे मनोगत काय होते हे सांगण्याला नीलकंठी प्रतही उपयोगाची नाही आणि भांडारकर संशोधन संस्थेने सिद्ध केलेली चिकित्सक आवृत्तीही उपयोगाची नाही. पण लेखकांना हा मोह झाल्याशिवाय राहात नाही. महाभारतातील कथेविषयी आपणाला जे वाटते ते हे आहे इतके सांगून गप्प बसणे अभ्यासकाला आवडतच नाही. नीलकंठ जरी झाला तरी तो व्यासाला समकालीन नव्हे. सतराव्या शतकाच्या अखेरी असणारा तो एक लेखक आहे. नीलकंठ त्याला उपलब्ध झालेल्या महाभारतावर भाष्य लिहितो. एखादा मुद्दा महाभारताच्या नीलकंठी प्रतीत असला

३६
ओळख