पान:ओळख (Olakh).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



व देवयानीचा गट ही दुसरी बाजू. म्हणून भोग विरुद्ध संयम ह्या संघर्षाची, पार्थीव प्रेम विरुद्ध दिव्य प्रेम ही अजून एक बाजू ठरते.
 ह्या सगळ्या कथानकात ययाती भोगाचा प्रतिनिधी केव्हा व का होतो ह्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. पैकी ययाती हा भोगलंपट होतो, भोगासक्त होतो, एवढाच एक भाग आपण ठाम गृहीत धरलेला दिसतो. जर आपण असे मानणार असू की देवयानीशी विवाह करणारा राजा मनाने निकोप आहे, तर मग ययातीचा मनोभंग झाल्यानंतर आपली व्यथा झाकण्याच्या व स्वतःला विसरण्याच्या प्रयत्नांत ययाती भोगलंपट होते असे मानावे लागेल. हे मानावयाला हरकत काहीच नाही. शिरवाडकरांनी तसेच मानले आहे. पण हा लंपट ययाती दारू व स्त्रियांच्या आसक्तीत बुडालेला सुखलोलुप असणार. हा मिष्ठेवर उत्कट प्रेम करणारा आपल्या स्वप्नातला राजा नव्हे. देवयानीकडून दुखावला गेलेला व मद्य व मंचकाच्या आधारे ह्या मानभंगाला उत्तर शोधणारा ययाती जर घ्यावयाचा असेल, तर मग शर्मिष्ठा ही त्याची अजून एक भोगदासी होईल. आपण शर्मिष्ठा व ययातीची प्रेम कहाणी विसरायला शिकले पाहिजे. शिरवाडकरांचे कथानक ह्या जागेवर दुबळे झालेले दिसते. देवयानीने पित्याकडे तक्रार केल्यानंतर जर ययातीला वार्धक्याचा शाप मिळणार व त्यानंतरच ययाती पुत्राकडे तारुण्य मागणार, हा दुवा जर आपण मान्य करणार असू तर पुनः तरुण झालेला, शापकाळात तारुण्याच्या हानीने भयग्रस्त झालेला, हा ययाती आता मिळालेल्या संधीचा भोग घेताना भोगलंपट झाला, असे आपण म्हणायला हवे. देवयानीशी कलह ययातीला भोगासक्त करीत नाही. तसे मिष्ठेचे एकनिष्ठ उत्कट प्रेमही ययातीला लंपटतेपासून वाचवू शकत नाही. अचानक आलेले म्हातारपण त्याला भोगासक्त करते, असे स्पष्टीकरण आपण मान्य केले पाहिजे. माणसाच्या भोगासक्तीला प्रेमातून बंधन प्राप्त होत नसते. भीतीतून भोगाचा उदय होतो. व भीतीवर मात करणारा बलवान आधार जर तपश्चर्येतून निर्माण झाला, आपणाला हा आधार कुणी तरी उपलब्ध करून दिला, तरच त्या बलवान आधाराच्या साह्याने भोगावर मात करता येते, असे म्हणावे लागेल. ह्या कथेत कचाचे तप यशस्वी व्हायचे असेल, जर कचाच्या प्रभावे ययातीचा उद्धार होणार असेल तर शर्मिष्ठेचे प्रेम आणि पुरूचे दिव्य दान निरर्थक ठरणे भाग आहे. खांडेकरांचे कथानक ह्या जागेवर येऊन रुतलेले आहे. त्याला इथे वाटसापडत नाही.

 भोगवादावर उत्तर प्रेमाची उत्कटता हे नव्हे. त्यागाची दिव्यताही इथे उत्तर नव्हे. माणसाची चिकित्सा मूढ करू शकणारा दैवी चमत्कारच फक्त भोगवादाला योग्य उत्तर होऊ शकतो. ही भूमिका नव्या अंधश्रद्धांना जन्म

२४

ओळख