आजच आपण ययातीला भोगाचा प्रतिनिधी मानतो असे नाही. शतकानुशतके ययातीला आपली परंपरा भोगाचा प्रतिनिधीच समजत आली. महाभारतात कोणताही आधार नसलेली क्षेपक कथानके ययातीच्या नावाने पुराणांमधून आलेली आहेत. ह्या कथानकांना आधार नसेल. ती कथानके खोटी, बनावट व उत्तरकालीन असतील. पण ही कथानके समाज ययातीकडे कोणत्या पद्धतीने पाहात होता ह्याची तर द्योतक आहेत की नाहीत? पद्मपुराणात अश्रुबिंदूमतीच्या स्वयंवराची एक कथाच आलेली आहे. जराग्रस्त ययातीच्या वासना अजून ताज्या होत्या. त्याने तरुण व देखण्या अश्रुबिंदूमती बरोबर विवाह करण्याची इच्छा धरली. अश्रुबिंदूमती म्हणाली ययाती, तू तरुण हो म्हणजे मी तुझ्याशी विवाह करीन. ह्या नवतरुणीच्या उपभोगासाठी आतुर झालेल्या ययातीने आपले वार्धक्य पुत्राला दिले व स्वतः नवे लग्न केले. अशी ही कथा आहे. पद्मपुराणातील कथा आपण उत्तरकालीन म्हणू; पण तरी त्यामुळे सातशे आठशे वर्षे भारतीय मन ययातीला सतत भोगाचे प्रतिनिधी मानत आले, हे विधान अबाधितच राहाते. रामाची कथा ही आपण मुळात वाल्मिकीची मानतो; पण म्हातारपणी पत्नीच्या मोहात अडकून पुत्राला वनवास देणाऱ्या दशरथाला आपण भोगाचा प्रतिनिधी समजत नाही.
प्रत्यक्ष महाभारतात म्हातारपणी विवाह करून कर्तबगार पुत्राच्या सुखाचे मातेरे करणारा राजा शंतनू आहे. म्हातारपणी लग्न करून सुख भोगता यावे, ह्यासाठी तारुण्याच्या मोबदल्यात आश्विनीकुमारांना सोमपान देणारा ऋषी च्यवन आहे. जागोजाग पतन होणाऱ्या ऋषींच्या कहाण्या आहेत. पण समाजमन भोगाचा प्रतिनिधी ययातीलाच मानते. उगीचच ययातीला शतकानुशतके हा आरोप सहन करावा लागला आहे. ऋग्वेदातील दीर्घतमसाला त्याची बायकामुलेच कंटाळली व त्यांनी जिवंतपणी त्याला नदीत फेकून दिले पण दीर्घतमसाने वार्धक्य व अंधपण असूनही आपली खोड सोडलेली दिसत नाही. तो ऋषी सुटला. ययाती मात्र पुरता सापडला. आता ययातीची सुटका होणे कठीण आहे.
प्राचीन लेखकांच्या समोर नसणाऱ्या अडचणी भाऊसाहेव खांडेकरांच्या समोर होत्या. भोग विरुद्ध संयम हा संधर्ष उठावदारपणे रंगवायचा असेल तर ययातीच्या कथेत त्यांना संयमाचा प्रतिनिधी हवा होता. भोग विरुद्ध संयम हा नुसता अध्यात्माच्या क्षेत्रातील प्रश्न नव्हे. तो आजच्या राजकारणातला यक्षप्रश्न आहे. आपण राजकारणाचा विचार करताना त्यात दडलेले नैतिक प्रश्न प्रायः दुर्लक्षित करतो. खांडेकरांसमोर हे प्रश्न सातत्याने होते. राजकारणात अनुस्यूत असणाऱ्या प्रश्नांचे भान ज्या लेखकांमध्ये अतिशय जागृत होते,