मुळे विकल यती व त्याच मार्गावरचा ययाती ही जोडी येते. ते समाजवादी असल्यामळे कच येतो. भोग विरुद्ध संयम, त्याग विरोधी संयम, असा हा त्रिकोण आहे. ह्या वैचारिक चौकटीत देवयानी ही पतीची दरबारी सावली आहे आणि शर्मिष्ठा ही कचाची कौटुंबिक सावली आहे.
बहुतेक समाजवाद्यांना आपण जडवादी आहो हे माहीत असते. आपले तत्त्वज्ञान आर्थिक आहे हेही माहीत असते. आर्थिक प्रश्न हे परमसत्य आहेत असे समजूनच समाजवादी नेहमी बोलत असतात. पण आपले तत्त्वज्ञान मूलतः नैतिक आहे. मानवी प्रतिभेने हजारो वर्षे ज्या न्याय्य जगाचे स्वप्न पाहिले ते स्वप्न व्यवहारात साकार करणारे आपण शतशतकांतील नैतिक जाणिवांच्या स्पंदनाचे वारसदार आहो हे समाजवाद्यांना प्रायः माहिती नसते. उपलब्ध असणाऱ्या सर्व समाज रचना, ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांच्या सोयी व गरजा सांभाळताना निर्माण झालेल्या समाज रचना आहेत. ह्या समाजरचनांचा आधार 'गरज' होता. एंगल्सने समाजवादपूर्व जगाला 'गरजांचे जग' असे म्हटले आहे. ही गरज कुणाची? जे स्वामी होते त्यांची गरज आणि इतरांना जगायचे होते त्यांची गरज. ह्या गरजांनी समाजरचनांना आकार दिले, आधार दिले. एंगल्स म्हणतो समाजवाद हे एक उड्डाण आहे. गरजांच्या बंदिस्त परिघातून विशाल स्वातंत्र्याच्या वातावरणात समाजाचे भव्य उड्डाण म्हणजे समाजवाद. (ग्रेट लीप फ्रॉम द रेल्म ऑफ नेसेसीटी इन टू रेल्म ऑफ फ्रीडम). एंगल्सचे हे वचन पाठ असणाऱ्यांनाही समाजवाद ही मूलतः एका नैतिक समाज रचनेच्या उभारणीची प्रक्रिया आहे हे माहीत नसते. ह्या ठिकाणी माहीत नसणे ह्याचा अगदी साधा अर्थ घेतला पाहिजे. हा साधा अर्थ असा की तुमचे तत्त्वज्ञान नैतिक आहे असे म्हणताच बहुतेक समाजवादी हा 'आरोप' समजून नाकारतील. तरीही समाजवाद हे नैतिक तत्त्वज्ञान आहेच.
तुम्ही कोणत्याही समावाद्याला विचारा तो सांगेल एकाने अनेकांची लूट करावी ह्या सूत्रावर समाज उभा आहे. तुम्ही त्याला विचारा जर शक्य असेल तर एकाने अनेकांची लूट करायला काय हरकत आहे? संतापाने लाल होऊन तो म्हणेल, 'हा अन्याय आहे तो आम्ही चालू देणार नाही.' समाजवाद्यांच्या समोर न्याय्य समाजरचनेचे चित्र असते. 'न्याय' ही नैतिक कल्पना आहे. आर्थिक नव्हे. जर सगळेच जण सारखेच दरिद्री व गुलाम असतील तर समाजवादी या अवस्थेला समता मानतील काय? समाजवाद्यांच्या समतेचा गाभा स्वातंत्र्य आणि प्राथमिक गरजांच्या पूर्तीची हमी हा असतो. गुलाम माणूस शब्दाने नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहारात मुक्त व निर्भय करण्याला हे दर्शन वचनबद्ध आहे. समाजात सर्वांना प्रतिष्ठा व अभय ह्याची हमी देणे समाजवादी