Jump to content

पान:ओळख (Olakh).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकृती असत्य आहे असे समजणाऱ्यांचे सामाजिक जीवन तर अर्थशून्य होईलच पण वैयक्तिक जीवनात तरी ही माणसे समाधानी होऊ शकतील काय? भाऊंचे ह्या प्रश्नाला नाही असे उत्तर आहे. यतीच्या सर्वसाधनेचे फल काय तर वेडे होणे इतकेच. यती वेडा होऊन भटकत असतो ह्या घटनेला ह्या कादंबरीत अर्थ आहे. प्रकृती मिथ्या मानणाऱ्या परंपरावाद्यांचा फोलपणा यतीच्या रूपाने चित्रित झाला आहे.

 खांडेकरांना एक सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून, भोग विरुद्ध त्याग हा संघर्षच मान्य नाही. मान्य नाही म्हणजे जीवनात असा संघर्ष नसतो असे नाही. असा संघर्ष असतो पण खांडेकरांना तो दोन असत्यांमधील संघर्ष वाटतो. ज्यावेळी असा दोन असत्यांमध्ये संघर्ष असतो त्यावेळी कुणाचाही जय झाला असे आपणास वाटले तरी हे वाटणे हा एक भ्रमच असतो. ह्या अकल्याणकारी अभासाला कवटाळण्यास खांडेकर मनाने तयार नाहीत. धर्म परंपरेला नेहमीच असे वाटत आले की भोगवादाची व्यर्थता दाखविणे पुरे आहे. उपभोगाने उपभोग संपत नाही, आग्नीला आहुती दिली म्हणजे तो जसा वाढतच जातो त्याप्रमाणे काम वाढतच जातो. भोगातून मिळणारे सुख नाशिवंत असते. तेच स्थिर नव्हे. धर्म असे मानतो हे सांगणे पुरे आहे. आपण आपला मुद्दा सिद्ध केलेला आहे. खांडेकरांना तसे वाटतच नाही. ते त्याग वैराग्याची व्यर्थता दाखवू इच्छितात. व्यक्तीच्या जीवनात त्याग विरोधी भोग हा संघर्ष क्षणकाळासाठी असू शकतो. पण समूहजीवनाचे काय? ज्यांना माणसाप्रमाणे जगण्यासाठी लागणाऱ्या किमान सवलतीही कधी उपलब्ध नव्हत्या त्यांना आपण त्याग सांगणार म्हणजे नेमके काय सांगणार? सामाजिक जीवनाचे नेमके वर्म इथे आहे. ज्यांना आपले भोग सुरक्षित ठेवायचे असतात तेच त्याग, वैराग्याचे ढोल फार जोराने बडवितात. सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून वैराग्य मार्गाचा फोलपणा सांगणे जडवाद्याला भाग असते. यतीची सगळी कथाच खांडेकरांना कल्पनेतून रचावी लागली. पण ती रचणे व सांगणे भाग होते. कारण खांडेकरांची मांडणी ही एका इहलोकवादी जडवाद्याची मांडणी आहे. अध्यात्मवाद्यांचा जडवाद्यांच्यावर नेहमी असा आक्षेप राहिला आहे की जडवाद हे भोगवादी तत्त्वज्ञान आहे. अर्जुना तू लढ, जिंकलास तर भोगण्यासाठी पृथ्वीचे राज्य आहे. मेलास तरी हरकत नाही कारण स्वर्गाचा भोग तुझा आहे. ही गीतेतील उभयपक्षी भोग नक्की असे सांगणारी भूमिका अध्यात्मवादी समजावयाची आणि जडवाद मात्र भोगवाद समजावयाचा अशी प्रथा आहे. चार्वाकावर नेहमी हा आक्षेप राहिला. खा, प्या मजा करा, भोग घ्या हा जणू चार्वाक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. असे समजून दीर्घ काळ जड-

ओळख
१५