पान:ओळख (Olakh).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथातील काही परिशिष्टे आकलनाच्या दृष्टीने फार मला महत्त्वाची वाटतात. ( खाडिलकरांच्या बाबत त्यांनी दिलेल्या परिशिष्टापेक्षा वामन मल्हार विषयक परिशिष्ट अत्यंत व्यापक पायावर आधारलेले आहे ही एक बाब आणि कोल्हटकरांच्या ग्रंथाला असे परिशिष्ट लावण्याची गरज वा. लं. ना वाटली नाही ही दुसरी बाब. ह्या दोन्ही बाबी चितनीय आहेत. वामन मल्हारांचे परिशिष्ट अतिशय व्यापक पायावर रचणे आवश्यक होते. कारण वामन मल्हारांच्या आकलनासाठी मिल व मार्क्स थोडाफार माहीत असावा लागतो, इब्सेनच्या नाटकाचा इंग्लंडमध्ये पहिला प्रयोग केव्हा झाला येथपासून ते सत्यशोधक समा. जाच्या स्थापनेपर्यंतच्या बाबी समजून घ्याव्या लागतात. खाडिलकरांचे आकलन करण्यासाठी सेक्सपिअरसुद्धा नोंदविण्याची गरज पडत नाही. त्याची मराठी भाषांतरे नोंदविली म्हणजे काम भागते. वामन मल्हारांचे आकलन आणि खाडिलकरांचे आकलन यातील हा फरक दोघांच्याही वाङमयात व्यक्त झालेल्या अनुभवांच्या कक्षांची व्याप्ती पुरेशा स्पष्ट करणारा आहे. ) वा. लंचे हे परिशिष्ट १८६२ पासून सुरू होते. मराठी नाटकाचा उगम आपण सर्वजण विष्णुदास भावे यांच्यापासून मानतो. एका दृष्टीने असे मानणे रास्त आहे. नाटक ही घटना आणि नाटक हा प्रयोग विचारात घेतला म्हणजे विष्णुदास भाव्यांच्या पासूनच आरंभ केला पाहिजे. पण नाटक ही वाङमयीन कलाकृती असा आपण विचार करू लागलो तर मराठीतील पहिले विचारात घेण्याजोगे नाटक कीर्तने यांचे आहे. वा. लं. नी हा आरंभ अचूक हेरलेला आहे. खाडिलकरांना लहानपणी 'शाकुंतल', ' मच्छकटिक' ही नाटके पाहण्यास मिळाली होती ही गोष्ट या परिशिष्टावरून समजते. विचार करताना आपण किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर आणि खाडिलकर याप्रमाणे विचार करतो. पण फाल्गनरावांचा संशयकल्लोळ' होऊन ते नाटक लोकप्रिय होण्यापूर्वी कोल्हटकर घड़न गेले आहेत. 'संशय कल्लोळ', 'फाल्गुनराव' या स्वरूपात रंगभूमीवर येण्यापूर्वीच खाडिलकरांचे पहिले नाटक लिहून झाले आहे. ही गोष्ट ह्या परिशिष्टावरून स्पष्ट होईल. 'सवाई माधवरावांचा मृत्यू' सारखे नाटकसुद्धा · विविधज्ञानविस्तारातून' प्रकाशित झाल्यानंतर त्याचा प्रयोग होण्यास १०-११ वर्षे तशीच निघून जावी लागली ही माहिती खाडिलकरांच्या नाटकांनी जनतेच्या मनाची पकड प्रथमतः घेण्यास किती वेळ जावा लागला हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. खाडिलकरांचे 'मानापमान' आणि गडकऱ्यांचे प्रेमसंन्यास', खाडिलकरांचे 'स्वयंवर' आणि गडक-यांचे 'पुण्यप्रभाव' यांचे परस्परसंबंध व लोकांसमोर येण्याचे त्यांचे काळ या परिशिष्टावरून अतिशय स्पष्टपणे समजून येतील. नाटकांच्या नोंदी करताना आपण फार ठोबळ नोंदी करतो. · सौभद्र',

ओळख

११८