पान:ओळख (Olakh).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोल्हटकर जीवनवादी समीक्षेतील प्रमुख बाबी आग्रहाने मांडताना दिसतात. हे दोन संप्रदाय परस्पर विरोधी आहेत हे कोल्हटकरांना उमगलेले नव्हते काय ?
 करंदीकरांचे मत असे होते की, कोल्हटकरांचे मन परंपरावादी आहे. परंपरावादी मनात अनेक विसंवादी व विसंगत बाबी सुसंगत म्हणन वावरत असतात व त्यांच्या परंपरावादी मनाला यात काही विसंगती आहे असे जाणवत सुद्धा नाही. नीतिमान, चारित्र्यमान जीवनाचा आग्रह व गणिका मैत्री हयातील विसंवाद जुन्या जगाला उमजतही नसे आणि त्यांच्या नीतिकल्पनात हा विसंवाद, विसंवाद म्हणून येतही नसे. विषम समाजरचना आणि त्यासह असणारे कोटयवधीचे दारिद्रय ह्याचा समाजाच्या अंधश्रद्धेशी संबंध आहे असे त्यांना वाटत नसे. समाजसुधारणेचा आग्रह धरणा-यांना हे सगळे स्मृतिमान्य आहे असे सांगण्याची प्रबल हौस होती. त्यात काही चुकले असेही वाटत नसे. त्यांच्यासमोर जीवन नसेच. जीवन ही एक मिथ्या बाब होती. त्यांच्यासमोर प्रश्न होते. प्रश्नांसाठी कथानके असत. कथानक - स्वभावरेखेतून, स्वभावरेखाजीवनातून उदयाला येतात. असे वाटण्याऐवजी समस्येसाठी कथानक-कथानकातून व्यक्तिरेखा आणि हे सगळे रंजक वाटावे ह्यासाठी कल्पकता व भाषा असे गणित त्यांच्या मनात होते. म्हणून समस्या व कथानक घेताना ही माणसे नीतीप्रधान आहेत. आपण उपदेश करतो आहो असे त्यांना वाटते. हा उपदेश रंजक करण्यासाठी ही माणसे प्रयत्न करतात व रंजन करण्यातील यशावर आपले कलात्मक यश मोजतात. हा सगळा शर्करावगंठित पण औषध देण्याचा प्रकार आहे. कांतासंमित पण उपदेशाचा प्रकार आहे असे करंदीकरांचे म्हणणे होते. मला हे म्हणणे एकाएकी पटले नाही तरी चिंतनीय वाटले.

 करंदीकर आता या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहेत. शिल्लक आहे ते त्यांचे लिखाण. जे लिखाण शिल्लक आहे ते त्यांनी केलेल्या चिंतनाचा फक्त अंशमात्र आहे. आणि तरीही शिल्लक आहे तेही खूप विचारप्रवर्तक व लक्षणीप आहे हेही खरे आहे.

ओळख -८

११३