कोणत्याही समाजसुधारकाच्या विचारांना वर्तमानाशी जोडणे, त्याची सुसंगती शोधणे ही काळाची गरज असते. मात्र, ते काम कठीण असते. क्लेषकारीही असते. समाजसुधारकांचे विचार नेहमी भविष्यवेधी असतात. महाराष्ट्र म्हणजे समाजसुधारकांची खाणच होय. त्यात छत्रपती शाहू महाराजांच्या वैचारिक भूमिकेचे वेगळे असे स्थान आहे. मात्र, आज शाहू महाराजांच्या विचारांची तळी उचलणारे कार्यकर्ते नि अनुयायी कृतीच्या पातळीवर फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही. राजकीय पातळीवर म्हणाल तर शाहू महाराजांचे विचार ही सत्ता सुरक्षिततेची हुकमी खेळी बनू पाहते आहे. मग ते बहुजनांचे सरकार असो वा शिवशाही! शाहूंच्या कार्याचं ‘गुडविल' घेऊन आज अनेकजण मिरवताना दिसतात. या पार्श्वभूमीवर शाहूंचे विचार वर्तमानात किती गांभीर्याने आचरले जातात, याची चाचपणी करायला हवी. उत्सव करण्यात कधी कधी शह-काटशहाचं राजकारणच दिसतं. आपला झेंडा फडकविण्याची उर्मी कधी कधी जाणवते. प्रासंगिक व्याख्यानाच्या आयोजनाने वैचारिक तरंग उठविण्यापेक्षा फारसं काही गंभीर घडताना दिसत नाही. म्हणून शाहूंच्या विचारांची वर्तमानात सुसंगती शोधणे मला क्लेषकारक वाटते. राजर्षी शाहूंनी सामाजिक न्याय व समतेचा दिलेला लढा ज्या संघर्ष नि समन्वयाच्या शैलीनं हाताळला व ज्या सुधारणा रुजवल्या त्या वर्तमानात विकसित होताना अपवादानेच दिसतात.
शाहू महाराजांनी नाशिकच्या श्री उधाजी मराठा वसतिगृहाच्या कोनशिला बसविण्याच्या समारंभप्रसंगी (१५ एप्रिल, १९२०) केलेल्या भाषणात ‘मदर ऑफ पार्लमेंटस्' (ब्रिटन) च्या धर्तीवर कोल्हापूरचं वर्णन 'मदर ऑफ बोर्डिंग