जातीनिरपेक्षतेच्या दिशेने...
भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडे ‘शाळेच्या दाखल्यावर फक्त धर्म वा राष्ट्रीयता यांची नोंद करावी, जातीचा उल्लेख काढून टाकावा.' असे आवाहन केले आहे. आपली यासंबंधीची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, “आजची तरुण पिढी जातीवर आधारित राष्ट्रीयत्व व निखळ राष्ट्रीयत्व अशा मानसिक संघर्षात सापडली आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आज कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नाही. जुनी व्यवस्था तिला पुनःपुन्हा जातीच्या परीघातच ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या भाषणात जातीच्या उच्चाटनाचे विस्तृत विश्लेषण व समर्थन केले आहे. त्यांच्या मतानुसार, “जातीमुळे समाजाचे विघटन व नैतिक अधःपतन होते... जातीयतेने सामाजिकतेची जाणीव मरून गेली आहे... जातीविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... मनात जातीय वृत्ती रुजवणारा धर्म हाच याला जबाबदार आहे... खरे शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातिभेद पाळायला शिकवणारी शास्त्रे आहेत... लोकांची शास्त्र प्रामाण्यावरील श्रद्धा प्रथम नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. बुद्ध व नानक यांच्याप्रमाणे ‘शास्त्र प्रामाण्य' धुडकावले पाहिजे... हिंदू समाज हा जेव्हा जातिविरहित समाज बनेल, तेव्हाच त्याला त्याचे स्वतःचे संरक्षण करण्याइतपत सामर्थ्य प्राप्त होण्याची आशा करता येऊ शकेल. यासाठी त्यांनी या भाषणात सहभोजन व आंतरजातीय विवाहाचे समर्थन केल्याचे आढळते. हे भाषण १९३६ चे आहे.