घेतली जाते. पहिल्या दिवसापासून त्याला स्वतंत्र झोपवले जाते. आपल्याकडे कुशीत, कडेवर सतत बाळ ठेवण्यातून जो पाश तयार (Attatchment) होतो तो तोडणे मग अवघड होते. याचा अर्थ मुलांना अनाथ करणे होत नाही. मधल्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकातून घरे तुटली. “हम दो, हमारे दो' चा काळ संपला. आता ‘ओन्ली वन'चा काळ आला. पण मुलं ‘लोन्ली' झाली ती घरी आजी-आजोबा नसल्याने. स्त्री विकास म्हणजे जबाबदारी मुक्त स्वैराचार नव्हे याचे तारतम्य ठेवले तरी सुवर्णमध्य गाठता येणे शक्य आहे. हे मी माझ्या घरच्या उदाहरणावरून सांगू शकतो.
एकविसाव्या शतकाचे पहिले दशक संपले. आज स्त्री शिक्षण व विकासाचे जे स्थूल चित्र समोर येते ते पाहणे भविष्यकालीन मार्ग निश्चितीस उपयोगी पडेल असे वाटते. सध्या आपण जन्मप्रमाणावर नियंत्रण करण्याच्या आघाडीवर यशस्वी झालो आहोत. एक, दोन, तीनच्या पलीकडे अपत्ये सहसा दिसत नाहीत. महानगरातून (मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली इ.) लग्नाशिवाय एकत्र राहण्याचे प्रमाण वाढत आहे. (Live in Relationship) कुटुंब नियोजन साधनांच्या वापराची जागृती खेड्यातही पाहण्यास मिळते. ती स्त्रियांमध्येही दिसून येते हे महत्त्वाचे. शहरांमधून नवविवाहित दांपत्यात ‘एक चूल, एक मूल’ सर्वत्र आढळू लागले आहे. प्रौढ आई-वडील (आजी आजोबा), मुलं, मुली स्वतंत्र झाल्यावर (नोकरी, लग्न इ.) स्वतंत्र राहण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांचा मानसिक ताण, एकटेपण नवजात पिढी भोगते आहे. त्याचे गंभीर परिणाम लवकरच दिसू लागतील. मुलं हट्टी होणे, अभ्यास न करणे, मोठी होऊन वाममार्गी होणे, बाहेरख्याली वागणे (मुलांचं तसेच मुलींचंही!) यातून पालकांची बेजबाबदारीच स्पष्ट होईल. भारतातील नोकरदार वर्ग हा नवश्रीमंत उच्चवर्ग होत आहे. स्त्रियांचे स्वातंत्र्य, कमावतंपण, बाहेर राहणे, प्रवास, मोबाईल यातून विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांचा आलेख गतीने वाढतो आहे. त्यात आपली स्पर्धा युरोप, अमेरिकेशी असावी असे चित्र आहे. छोट्या शहरातून व गावातूनही मोटरसायकल लाँग रायडिंग, मुलींचे वाढते मास्क (ते प्रदूषणासाठी कमी, ओळख दडवण्यासाठी अधिक), मुलांच्यात कॅपचा वाढता वापर, वीकएंड टूर्स, डे-आऊट, टर्म लॉजिंग (तासावर खोली भाड्याने घेणे) यासारख्या गोष्टींचा सुळसुळाट म्हणजे पालकांच्या स्वातंत्र्य व दुर्लक्षांचेच परिणाम होत. संधी, सुविधांबरोबर जबाबदारीची जाणीव देणे घरोघरी संपते आहे. राहिले फक्त उपदेश. 'मागितले ते दिले' यातून होत नाही. मुलांमधील गुंतवणूक म्हणजे त्यांच्यासाठी वेळ देणे व वेळ काढणे आज महत्त्वाचे ठरले आहे. नेमके तेच होत नाही. पूर्वी