पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समानपणे शाळेत पाठविण्याची सामाजिक मानसिकता विकसित झाली. पुढे सन १९६३ मध्ये तर शासनाने मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक समिती नेमली. यातून गृहविज्ञान, हस्तकला इ. विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला.
 वर्षभराच्या अंतरानेच भारत सरकारने भक्तवत्सलम समिती नेमून तिला ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणाचा अभ्यास करून उपाय सुचवायला सांगितले, तेव्हा त्या समितीने समाज सहभाग व सहकार्य आवश्यक असल्याचे मत नोंदवून स्त्री शिक्षणाच्या सर्व स्तरांवर शिक्षण प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली. आज स्त्री शिक्षणविषयक जो भावजागर दिसून येतो तो अशा वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांचे ते फळ होय. स्वातंत्र्याच्या प्रारंभी असलेली ही स्थिती पाहता स्वातंत्र्यानंतर आज ६४ वर्षे उलटल्यावर मागे वळून बघताना स्त्री शिक्षणविषयक पूर्वस्थितीचा कायापालट व कायाकल्प घडून आला आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्त होणार नाही.
 आज सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतात स्त्री शिक्षणाचे प्रमाण ६५.४६% झाले आहे. पुरुषांच्या ८२.१४% प्रमाणापेक्षा ते कमी असले, तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण ६० % प्रगती केली आहे हे उल्लेखनीयच म्हणावे लागेल. आज भारतात जगातील सर्वाधिक शिक्षित कमावत्या स्त्रिया आहेत. डॉक्टर, वकील, इंजीनिअर, शिक्षक, संशोधक इ. क्षेत्रातील स्त्रियांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे. पूर्व परिस्थितीचा विचार करता हे चित्र आशादायक असले, तरी शिक्षित स्त्रियांच्या विकासाचे विविध प्रश्न ऐरणीवरचे म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळांमधून मुलींचे गळती प्रमाण कमी होत असले तरी प्राथमिक स्तरावर स्त्री शिक्षकांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावर स्त्री विकासाचा स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. महाविद्यालयीन पातळीवर शिक्षण घेणाच्या मुलींचे व माध्यमिक स्तरावरील मुलींचे प्रमाण यातील दरी जोवर कमी होणार नाही, तोवर स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण पुरुषांइतके होणार नाही. ज्या युवती पदवीधर होतात त्यांचे नोकरीचे प्रमाण पदवीधर पुरुषांच्या प्रमाणात कमी आहे. स्त्री नोकरीविषयक पुरुषी दृष्टिकोन हे त्याचे प्रमुख कारण होय.

 आज भारतात पुरुष बेकारी ५४.४% आहे, तर स्त्री बेकारी ही ७७.३% आहे. आज जागतिकीकरणामुळे रोजगाराच्या नव्या संधी व क्षेत्रे उपलब्ध आहेत. बीपीओ, कॉल सेंटर्स, आयटी, बँकिंग, मार्केटिंग, सव्र्हे, मॉल्स, टेलिकम्युनिकेशन इ. क्षेत्रे स्त्री विकासाची नवी क्षितिजे होत. आज भारत सेवा क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार देणारा देश म्हणून जग त्याच्याकडे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४४