उदाहरण इतिहासात शोधून सापडायचे नाही. हे असे का व्हावे? या, विचाराची मोहिनी साध्या जगाला का पडावी? या नि अशा बदलाच्या खुणा या स्वप्नात दिसून येतात.
मार्क्सच्या शंभराव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्याच्या सामाजिक बदलाचे स्वप्न एक मागोवा म्हणून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. सन १८६४ मध्ये त्याच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा ग्रंथ ‘भांडवल' प्रकाशित झाला. त्यानंतरच्या काळात मार्क्सला त्याच्या विचारांना नि सामाजिक बदलाच्या स्वप्नाला समर्थक नि विरोधक दोघांनी विकृत केले. समर्थकांचे आंधळे प्रेम नि विरोधकांची कट्टरता या दोहोंमुळे मार्क्सच्या नि त्याच्या विचारांच्या संदर्भात समजापेक्षा गैरसमजच अधिक निर्माण झाले.
मार्क्सने आपल्या विचारात सामाजिक बदलास असाधारण महत्त्व दिले आहे. सामाजिक बदल हे त्याच्या दृष्टीने एक साधन होते. मुळात त्याला माणूस बदलायचा होता. माणसाची सारी भिस्त मुळी समाजावर असते, हे त्याने ओळखले होते. समाजाचे दडपण ही सर्वांत मोठी शक्ती असते. आपण जर समाजाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला तर माणूस बदलायला वेळ लागणार नाही असा मार्क्सचा कयास होता. त्याला हा बदल केवळ बाह्य स्वरूपात अपेक्षित नव्हता. आचरण, पोषाख, रूढी इ. बदलून भागणार नाही. या सर्वांच्या मुळाशी असणारी माणसाची मानसिक वृत्ती बदलायला हवी असा त्याचा आग्रह होता. माणसाचे विचार, मन, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, भावना सारं काही बदलायला हवं, अशी त्याची धारणा होती. मानवाने स्वतः निर्माण केलेले अन्याय, अत्याचार, विषमता इत्यादींचे अंधारे साम्राज्य त्याने स्वतः नष्ट करावे नि त्या जागी न्याय, समता, ममता, बंधुता इत्यादींनी युक्त असे माणुसकीचे राज्य साकारावे असे त्याचे स्वप्न होते.
असा सामाजिक बदल घडवून आणण्याचा मार्गही माक्र्सने सांगितला आहे. मार्क्सच्या सामाजिक बदलाच्या मार्गास हिंसाचारी मानणे योग्य ठरणार नाही. हिंसेचा, बळाचा वापर मार्क्सने नाकारला आहे. हिंसेने व बळाने नवे जग, नवा माणूस निर्माण करता येत नाही, अशी त्यांची श्रद्धा होती. हेही खरे की अहिंसाही त्याला त्याज्य होती. हिंसा जर लादली गेली तर तिचा धैर्याने स्वीकार केला पाहिजे, असे त्याचे मत होते. सामाजिक बदलाचा त्याचा मार्ग सर्वथा वेगळा होता. समाज बदलाची शक्ती हिंसे, अहिंसेपेक्षा सामाजिक आचार विचारात मूलभूत बदल घडवून आणण्याच्या भावनेत, दृष्टिकोनात