यामुळे कार्यक्षम जनसंख्या हे जागतिक पातळीवर भारताचे बलस्थान ठरले आहे. या कार्यबळाचे नियोजन करून त्याचे रूपांतर उत्पादित मनुष्यबळात करण्याचे आव्हान भारतीय नियोजकांना सतावते आहे.
छोट्या नि विभक्त कुटुंबाचा प्रघात
नागरीकरण, औद्योगीकरण इ. मुळे कुटुंबे छोटी होणे, विभक्त होणे स्वातंत्र्योत्तर काळात सुरूच होते. पण जागतिकीकरणाने कुटुंबातील सदस्य संख्येतील होणारी निरंतर घट यामुळे कुटुंबस्वास्थ्य, स्वातंत्र्य वाढत आहे. पण पाल्यांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. नाते-संबंधात वाढत जाणारे औपचारिकपण, आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकीसारखी जवळची नातीही स्वतंत्र कुटुंबाच्या प्रघाताने दुरावत राहिल्याने मुलांच्या वाढ व संस्कारक्षम वयात भावविश्वाची पोकळी रुंदावत चालली आहे. खेड्यातही हे प्रमाण वाढते आहे. पण भारतातील सरासरी कुटुंब सदस्यांची संख्या ५.५ होती, ती ५.४ झाली असली तरी सरासरी कुटुंबे जागतिकीकरणानंतरही तग धरून आहेत. युरोपातील एकटेपण, एक व्यक्ती कुटुंब व्यवस्था नजीकच्या भविष्यात येईल असे वाटत नाही. शहरात मात्र एकटे/एकटी राहणे काही नवी गोष्ट नाही. पण प्रमाण मात्र अल्प आहे हे नक्की.
स्त्रीप्रधान कुटुंबाकडे कल
स्त्री-पुरुष समानता, स्त्री भ्रूण हत्या बंदी, स्त्री शिक्षण प्रसार, ५0% स्त्री आरक्षण इ. अनेक गोष्टींमुळे घर व समाजावरील स्त्रीचे वाढते वर्चस्व भारतास विकसित देश बनवत आहे. घरातील स्त्री सुशिक्षित असणे, तिचं मिळतेपण व शहाणपण यातून घराच्या, कुटुंबाच्या निर्णय व नियंत्रणाचे होकायंत्र डावे होते आहे. सहविचार, सहअस्तित्व इ.मुळे खरेदी, शाळा, नातेसंबंधांचे निर्णय माजघरातून स्वयंपाकघरात गेले आहेत. जागतिकीकरणाचा हा सकारात्मक पैलू मानावा लागेल. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, संगीत, क्रीडा, नोकरी व्यवसाय, साहस... जीवनातले कोणतेही क्षेत्र काढा, तेथील स्त्रियांचा वाढता वावर व वर्चस्व हे स्त्री सक्षमीकरणाची साक्ष देताना दिसते. स्त्रीमधील श्रमनिष्ठा, समर्पण, एकनिष्ठा, कार्यसंस्कृती, उपजत शहाणपण, मार्दव असे अनेक गुण आहेत की त्यामुळे स्त्री ही कुटुंबप्रमुख म्हणून उदयास येताना दिसते.
घटस्फोटाचे प्रमाण
भारतात घटस्फोटास सामाजिक कलंकाच्या दृष्टीने पाहिले जात असल्याने त्याचे प्रमाण कमी होते. पण उदारीकरण, जागतिकीकरण, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीचं कमावतंपण इ. अनेक कारणांनी घटस्फोट, विवाह विच्छेदाचे प्रमाण