जबाबदारी मोजण्याची मोजपट्टीच कुणाच्या हाती राहिली नाही. पैसे देऊन शिक्षकांच्या नियुक्तीचा रूढ झालेला प्रघात संस्थाचालकांना रात्रीत संस्थानिक बनवतो. शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत जबाबदारीपलीकडे न पहायचं ठरवल्याने विना अनुदान शिक्षण अनुदार न झाले तरच आश्चर्य? या सर्वांचे गंभीर परिणाम उमलत्या पिढ्यांवर, मुलांवर होत आहेत.
घरातील वाढता विसंवाद हिंसेस निमंत्रण देणारा ठरत आहे. घरगुती हत्या, आत्महत्या, हिंसाचार, मानसिक छळ, भावनिक तणाव यामुळे मुलांवरील ताण वाढतो आहे. पालकांच्या अपेक्षा नि स्वप्नांच्या ओझ्याखाली वाढणारी पिढी शारीरिक कृश व मानसिकदृष्ट्या संकुचित, आत्मकेंद्रित, एकलकोंडी होत आहे. बंद घरात वाढणारी मुलं टी.व्ही. चे गुलाम व संगणकाचे स्वामी होत विकृत मनोवृत्तीकडे झेपावत आहेत. मी नि माझं'चा घरोघरी होणारा संस्कार, दिली जाणारी दीक्षा मुलांना अप्पलपोटीच नाही तर असामाजिक बनवत असल्याने आपलं राईएवढं दुःख, प्रश्न, समस्या त्याला एव्हरेस्ट वाटू लागली आहे. घरगुती हिंसा, अत्याचारांचे नागरी भागातील वाढते प्रमाण सामाजिक अस्वास्थ्याचे निदर्शक होय. सन २००४ च्या दिल्ली पोलीस अहवालानुसार हंडा, मानसिक छळ, कौटुंबिक अत्याचार इ. मुळे रोज ६ आत्महत्या होण्याची नोंद...तीही स्त्रियांची हे कशाचे फलित आहे?
राष्ट्रीयत्व, परंपरा, मूल्य इ.ची रोजची घसरण चिंता व चिंतनाचा विषय झाला आहे. गोधरा हत्याकांडासारखी घटना असो, बाबरी मशिदीचा विध्वंस असो...या साच्या घटना आपल्या धर्मांधतेचेच पुरावे नाहीत काय? खैरलांजी हत्याकांड आपल्या जातीय संघर्षाचे उदाहरण नाही का? ‘ऑनर किलिंग' आपल्या अमानुष रूढीग्रस्ततेचे लक्षण नव्हे का? मानव अधिकार उल्लंघन, राज्य व केंद्र शासनाची राजकारणप्रेरित कार्यनीती या सर्वांमुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं दिवसेंदिवस असहाय्य, आगतिक व अस्थिर होत आहे. यामागे ‘राज्य' संकल्पनेचे विसर्जनच कारणीभूत आहे.
सामाजिक सुरक्षा प्रश्नांविषयीची अनास्था, अशा योजनांतून शासनाचा काढता पाय, करारावर नोकर भरती, निवृत्ती, उपादान, भविष्यनिधीसारख्या योजनांचे खासगीकरण, निर्गुतवणुकीचे धोरण सरकारची आर्थिक, सामाजिक दिवाळखोरी ठरते आहे. पण शासनास त्याचे देणे-घेणे राहिले नाही. शासनास बहुराष्ट्रीय कंपन्यांना भांडवल पुरविण्यास पैसे आहेत पण नोकरदारांची देणी देण्यास नाही हे सामान्यांविषयीच्या असलेल्या अनास्थेचे द्योतक होय. मनुष्यविकासापेक्षा मॅकडोनाल्ड, नायकी, कोका कोला, मर्सिडिज, होंडाचा विकास त्यांचा प्राधान्यक्रम होतो आहे. त्यामुळे देशी हस्तव्यवसाय, लघुउद्योग,