पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केवळ 'बालककेंद्री' न राहता ते ‘बाल्यकेंद्री' कसे असते याची प्रचिती येते. शिक्षणाला भांडवली गुंतवणूक ठरविणा-या शासन व समाजाने, पालकांनी शिक्षणाचं पर्यावरण कधी मुळापासून समजूनच न घेतल्याने वर्गरचना, फर्निचर यांत अडकलेले शिक्षण सैल करून भिंतीबाहेरची शाळा साकारत लीलाताई सामूहिक वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करण्याचा घाट घालतात. त्याला विजय तेंडुलकरांसारखा संवेदनशील पाहुणा बोलवतात. डोळ्यांची आरती उतारतात (इथेही प्रयोग!). त्यामुळे शिक्षणाचे पर्यावरण एकदम समाजसंवेदी होऊन जाते! अपंगांच्या वेदना, अंधांची धडपड (खरे तर तडफड!) ही त्या अभिनव पद्धतीने समजावतात. 'पाणी' साक्षरतेचा त्यांचा प्रयोग असाच पर्यावरणाची भावसाक्षरता वाढविणारा. त्यामुळे सर्जनाचे शिक्षण जिवंत होतं.
 विद्यार्थ्यांना जे द्यायचे ते सकस. त्याचा शिक्षण गुणांक (Percentage) वाढविणारं ते नसतं. गुणवत्तावृद्धी (Quality and Excellence) त्यांचे ध्येय असतं. ती उत्तर ओकण्याच्या क्षमतेवर न जोखता तुम्हाला कळलेले स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीने कसे सांगता ती खरी गुणवत्ता. मुलखावेगळं उत्तरं देणारी मुले लीलाताईंना भावतात. म्हणून सृजनाचे विद्यार्थी स्वप्रज्ञ. ते नाटकासाठी तयार संहिता नाकारतात व स्वतः नाटक लिहितात. चौथीतील मुलांत निर्माण झालेला हा आत्मविश्वास सृजनाच्या आनंददायी व्यक्तिविकासाची किमया असते. एकविसाव्या शतकातील शिक्षण हे व्यक्तिविकासकेंद्री असलं पाहिजे, असा जागर आज सर्वत्र ऐकण्यास मिळतो; पण लीलाताईंनी हा गजर २५ वर्षांपूर्वी लावला होता, हे लक्षात घेतले की त्यांच्या दूरदृष्टीचा अचंबा वाटल्यावाचून नाही.

 ‘सृजन आनंद विद्यालयाची ही प्रायोगिक धडपड सामूहिक आविष्कार असला तरी त्यातील लीलाताईंची मानसिक गुंतवणूक कॅटॅलिक एजंटची भूमिका बजावणारी. गेली सतत २५ वर्षे त्या बालहक्क म्हणून बालशिक्षणाचा विषय लावून धरतात. त्यामागे भारताचे बाल्य समृद्ध नि संपन्न करण्याचा ध्यास आहे आणि नवा भारत स्वप्रज्ञ करण्याची तळमळही! जीवनाचे सहस्रदर्शन झालेल्या लीलाताई या वयातही तरुणास लाजवेल अशा समर्पणाने कार्य करतात. त्यांना त्रिवार कुर्निसात!

एकविसाव्या शतकातील शिक्षण/८७