पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खोली भाड्याने घेणे) यासारख्या गोष्टींचा सुळसुळाट म्हणजे पालकांच्या स्वातंत्र्य व दुर्लक्षांचेच परिणाम होत. संधी, सुविधांबरोबर जबाबदारीची जाणीव देणे घरोघरी संपत आहे. राहिले फक्त उपदेश करणे वा टाकून बोलणे. मुलांचे संगोपन व विकास म्हणजे 'मागितले ते दिले' यातून होत नाही. मुलांमधील गुंतवणूक म्हणजे त्यांच्यासाठी वेळ देणे व वेळ काढणं आज महत्त्वाचं ठरलं आहे. नेमके तेच होत नाही. पूर्वी हे काम ‘आई' करायची. तिलाही आता उसंत नाही असे चित्र वाढते आहे. याचा अर्थ आईने नोकरी करू नये, शिकू नये असे नाही; तर संयुक्त जबाबदारीचं तत्त्व घरोघरी अमलात यायला हवं, असं मला सुचवायचे आहे.
 आज शिक्षण व विकासामुळे स्त्रीवरील ताण रोज वाढत आहे. पूर्वी केवळ तिच्यावर घरची जबाबदारी होती. आता करिअर व घर अशा दुहेरी कात्रीत तिला स्वतःसाठी वेळ नाही अशी स्थिती आहे. हे सामाजिक व आरोग्य दोन्ही पातळ्यांवर अराजक निर्माण करणारं आहे. 'मिळून साच्याजणी'चा काळ मागे टाकून ‘मिळून सारेजण' अशी मानसिकता व कृती ऐरणीवर हवी. ‘पुरुष' भानाचे प्रश्न मांडून झाले. आता कृती हवी. पुरुषांनी स्वयंपाक करणं ‘बायकी' आणि स्त्रीने नोकरी करणं 'पुरुषी' दोन्ही संपून 'मेड फॉर इच अदर'ची समानताच स्त्रीविकासाचा महामार्ग होय.

 जो समाज स्त्रीशिक्षण व विकासातील दृश्य, अदृश्य अडथळे दूर करण्याबाबत सतत जागृत व कृतसंकल्प असतो, तोच नव्या युगातील प्रगल्भ समाज मानला जातो. स्त्री-पुरुष भेदापलीकडे 'माणूस' नावाचा समाज निर्मिणं म्हणजे खरा स्त्रीविकास होय. जो समाज स्त्रीला स्वतःचा अवकाश (Space) देतो तो प्रगत. अमृता प्रीतम यांनी स्त्रीला आपला ‘चौथा कमरा' (ड्रॉइंग रूम, बेडरूम, किचनशिवाय) खरे तर चौथा कप्पा जपण्यास सांगितले होते. त्यात स्वभाव व स्वविकासाचा जो संदर्भ होता, तो विसरून चालणार नाही. जर्मेन ग्रीयरनी लिहिलेली ‘दि ऑब्स्टॅकल रेस’, ‘सेक्स अँड डेस्टिनी’, ‘द मॅड वुमन अंडरक्लॉथ', 'द होल वुमन', 'दि फिमेल यूनॅक' सारखी पुस्तके कधी काळी मला स्त्रीविकासाची गौरवगीते वाटायची. आज मला पुन्हा वाचताना ती एकारली वाटतात, ती स्त्रीविकासाच्या एकांगी आग्रहामुळे. स्त्री आणि पुरुष मिळून असणारा समाज 'माणूस' असणे (Human being) विकसित करणं व माणूस म्हणून वागणं (Being human) हे आपले समाजधारणेचे ध्येय (Aim) असायला हवे. स्त्रीने सतत जागे राहण्यासाठीच बहुधा महादेवी वर्मा यांनी ‘जाग तुझको दूर जाना' कविता लिहिली असेल. खालील ओळी गुणगुणताना हे लक्षात येते.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/८१