पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धुळीने माखलेल्या मुलास घेऊन येते... शिकवा यालापण म्हणून. ती आई विधवा होती. मोलमजुरी करून दिवस कंठायची. मुलाचं नाव होतं घीसा. घीसा अबोल असायचा; पण बाईंवर प्रचंड भक्ती. शाळेवर विलक्षण प्रेम. ही शाळा रोज नाही भरायची. फक्त रविवारी. कारण बाई त्याच दिवशी सुट्टी म्हणून घरी यायच्या. घीसा दर शनिवारी पार सारवून, साफ-सूफ करून वाट पाहत असायचा. एक दिवस बाईंनी स्वच्छ कपड्यांचे महत्त्व शिकविले. त्या हे विसरूनच गेल्या होत्या की घीसा अर्धनग्न येतो रोज. लक्षात येताच त्यांचे मन अपराधी होतं. लक्षात येते ते घीसा नसल्याने, घीसा आईकडे साबणाचा हट्ट धरतो. दुकानदार धान्याच्या बदल्यात साबण द्यायला तयार नसतो. कॅशलेस असेल तर तो व्यापार कसला? घीसा कसा तरी साबण मिळवून आपला एकमात्र सदरा धुऊन तो ओलाच घालून आज्ञाधारक उभा! काही दिवसांनी बाईंचं होणार असतं ऑपरेशन. त्या आता येणार नसतात. सर्व मुले निरोप म्हणून बाईंना काही ना काही भेटवस्तू आणतात. घीसा एक टरबूज घेऊन येतो; पण त्यासाठी त्याला शेतक-याच्या मुलास आपला अंगरखा उतरवून द्यावा लागतो. घीसा परत अर्धनग्न! टरबूज त्यानं बोट घालून गोड आहे का पाहिलेलं होतं... शबरीच्या बोरासारखं! ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्याकडे गमवायला पण काही नसतं. असते फक्त प्रेम. शिक्षक विद्यार्थ्याला प्रेम देतो, जेव्हा तो निश्चिंतपणे शिकवू शकतो. तो मुलांना माणूस बनवतो. जेव्हा त्याला फुरसत असते. आज प्रत्येक शिक्षकांचे एकच मागणे आहे, ‘आम्हाला शिकवू द्या. विद्यार्थ्यांना माणूस बनवू द्या!'

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१४१