केली आहे. तीमध्ये आश्रमशाळेतील भौतिक सुविधा, शिक्षण सोई, कर्मचा-यांची कर्तव्ये, संस्थेने ठेवायच्या नोंदी, करायची कामे इत्यादी सविस्तर विवरण आहे. दीडशे पानांच्या पुस्तिकेत जे लिहिले आहे, ते होते की नाही, हे पाहणारी मोठी यंत्रणा आहे. ती मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत पसरलेली आहे. यंत्रणेत याच समाजातून शिकून, सावरून मोठे झालेल्यांचा भरणा आहे. तरी दुष्टचक्र थांबत नसल्याचे शल्य कुणाही संवेदनशील माणसाला पाझर फोडणारे नि अस्वस्थ करणारे आहे. असे असताना अनास्था का? याचे उत्तर ‘परदुःख शीतल' असेच द्यावे लागेल.
आश्रमशाळा, वसतिगृहे, बालगृहे अशांतील वारंवार घडणारे अन्याय, अत्याचार, शोषण, मृत्यू, दुरावस्था यांस कारण सक्षम यंत्रणेचा अभाव हेच होय. यासाठी बालक हक्क जागृती, पालक संघटन, प्रसारमाध्यम जागृती, यंत्रणेची दक्षता अशा अनेक गोष्टी सांगता, सुचविता येतील. प्रश्न आहे,आपल्या मानसिकतेचा व चारित्र्यघडणीचा. हा देश नोटा रद्द करून काळ्या पैशा आणि कृत्यातून मुक्त करता येईल का? त्याचे माझे स्पष्ट उत्तर 'नाही' असेच आहे. माझे चरित्र व चारित्र्य काळ्या पैशावर पोसणे मला गैर वाटत नाही तोवर निळी, पिवळी नोट जाऊन गुलाबी नोट आली म्हणून फरक पडणार नाही. मंत्री ब्रिफकेसभर पैसे घेऊन आश्रमशाळांना परवानगी देतात, अधिकारी पाकिटे घेऊन तपासणीतील उणिवांवर पांघरूण घालतात, हे सांगायला आता कोण्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही. बँकांच्या दारात लागलेल्या रांगा सामान्यांच्या होत्या. त्यांच्याकडे असलेल्या एकमेव पाचशे, हजारांच्या नोटेचे त्याचे मूल्य लाखांचे होते. लक्षपती, करोडपती, अब्जाधीशांचे पैसे आपोआप पांढरे झाले ना? ‘सामान्य’ आणि ‘तथाकथित प्रतिष्ठित' यांना समान वागणूक. कायदा जोवर अस्तित्वात येत नाही तोवर आश्रमशाळांची अनास्था संपणार नाही. युरोप व आशियातील दलित, वंचित, उपेक्षितांच्या अशा शाळा, वसतिगृहे, संस्था या देशातील शासकीय यंत्रणा किती तत्परतेने चालवितात हे जेव्हा मी पाहतो, तेव्हा लक्षात येते की आपले शिक्षण चरित्रघडणीत कुचकामी ठरते आहे. कायद्याचे भय नसणे, नियम तोडण्याची भीती नसणे आपल्या लोकशाहीची कमजोरी आहे. लोकशाही हक्ककेंद्रित आहे. ती कर्तव्यकेंद्रित केव्हा होणार यावर आपल्या सर्व समस्यांचे उत्तर अवलंबून आहे. दलित, वंचित बाल्याशी माझे काही नाते, देणे आहे असे येथील यंत्रणेला जेव्हा वाटेल तो सुदिन! मी त्याची वाट पाहत अद्याप प्रयत्नशील आहे. मी नसेन आताशा बाण सोडत; पण धनुष्य भुईवर अद्याप ठेवलेले नाही.