पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आश्रमशाळांमधील भयशील बाल्य


पार्श्वभूमी
 भारतीय राज्यघटनेच्या राज्यविषयक धोरणासंबंधी कलम ४६ मध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे संरक्षण करील.' यानुसार अनुसूचित जाती व जनजाती (Scheduled Casts and Tribes) साठी आदिवासी पट्टे, पाडे व डोंगराळ भागातील वरील प्रवर्ग रहिवाशांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी अनुसूचित जाती-जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन सोय करून शिक्षण देण्याच्या हेतूने आश्रमशाळा सन १९५३-५४ मध्ये सुरू करण्यात आल्या. आरंभीच्या वर्षात तत्कालीन द्वैभाषिक मुंबई इलाख्यात २२ आश्रमशाळा, खासगी प्रस्तावानुसार सुरू करण्यात आल्या. प्रारंभी आश्रमशाळा शिक्षण खात्याच्या अखत्यारीत कार्यरत होत्या. सन १९७५-७६ पासून त्या समाजकल्याण खात्याकडे वर्ग करण्यात आल्या. त्या स्वयंसेवी संस्था संचलित होत्या.

 सन १९७१-७२ मध्ये क्षेत्रविकासाचा दृष्टिकोन स्वीकारून महाराष्ट्र शासनाने ५००० ते ७००० आदिवासी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक सधन क्षेत्रासाठी आश्रमशाळा सुरू करण्याचे धोरण अंगीकारून १९७२-७३ मध्ये ४० आश्रमशाळा शासनातर्फे सुरू करण्याचे ठरविले. दुर्गम व डोंगराळ भूप्रदेशाची समस्या लक्षात घेऊन सन १९८२-८३ मध्ये सात जनजातीबहुल

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१३२