पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नि गर्दी ही प्रत्येक माणसास छुआन श्वाँग, वास्को द गामा, कोलंबस बनविते आहे. आई-वडिलांना काशीला नेऊन आणणारे श्रावणबाळही कमी नाहीत. या पार्श्वभूमीवर घरोघरी आलेली पर्यटन साक्षरता व सहज उपलब्धता लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्या सहली शैक्षणिकच असायला हव्यात. त्याला पर्याय असता, देता कामा नये. याबाबत दुमत असायचे कारण नाही. त्यासाठी नियमावलीही असायला हरकत नाही पण शिक्षक, शिक्षण स्वातंत्र्याचा त्यात संकोच असता, होता कामा नये. नियमावली मार्गदर्शक हवी. त्यात संस्थाचालक, मुख्याध्यापक, पालक संघटनांना कर्तव्य व जबाबदारिचे भान व बंधन मात्र हवेच हवे. विद्यमान शिक्षणमंत्र्यांची शैक्षणिक बांधीलकी या कामी दिसून येईल, अशी आशा करण्यास भरपूर वाव आहे.

 फिजी, फिनलंड, सिंगापूरसारखे छोटे देश सहलीसंबंधी राष्ट्रीय धोरण ठरवू शकतात, तर आपण का नाही? जिज्ञासूंनी WWW.education.gov.FJ da Fiji-Policies-Ministry of Education ही लिंक पाहण्यास हरकत नाही. गेल्या फेब्रुवारी, २०१६ मध्ये मुरुड समुद्रकिना-यावर एका महाविद्यालयाच्या सहलीतील १४ विद्याथ्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक सहलींवर बंदी आणली. विरोध झाल्यावर लगेच बंदी उठवली. असे का होते, तर आपण शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही म्हणून. शैक्षणिक सहल शिक्षणाद्वारे मनुष्यघडणीचे प्रभावी साधन व माध्यम होय. शालेय सोबत्यांबरोबर केलेला प्रवास, पाणी म्हणून जसे त्याचे महत्त्व असते, तसेच समूहजीवन, स्वावलंबन, सहजशिक्षण, जीवनशिक्षण म्हणूनही! सामुदायिक जीवनातून आनंद वाटून घेण्याचा, स्वतःला वाटलेले देवाणघेवाणीतून समजून घ्यायचे माध्यम नि साधन म्हणून सहलीचे शैक्षणिक जीवनात असाधारण महत्त्व असते. अशा उपक्रमास शिक्षक, चढ़ा-चढा, उतरा-उतरा, नंबर मोजा, ओळीत चला, हॉटेलात जेवा, धर्मशाळेत झोपा म्हणून बोळवण करीत असतील तर ते आक्षेपार्हच मानायला हवे. मी कोल्हापुरात राहतो. अनेक सहली इथे येतात. काय पाहतात? अंबाबाईचे देऊळ, पन्हाळा, जोतिबा, रंकाळा तलाव. अंबाबाईच्या देवळात देवीचे दर्शन, पन्हाळ्यावर फेरफटका, जोतिबा दर्शन, रंकाळा चौपाटीला भेळ, रात्री मुक्कामी धर्मशाळा, तांबडा-पांढरा रस्सास्वाद! या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाची आख्यायिका, देवळाचे शिल्पसौंदर्य, दक्षिण काशी माहात्म्य सांगताना मी ऐकलेले नाही. पन्हाळ्याचा इतिहास, सिद्धी जोहारचा वेढा जसा महत्त्वाचा तसा पन्हाळ्यातील बालग्राम, शिवाजी विद्यापीठाचे प्रक्षेपण केंद्र, सर्व रेडिओ/मोबाईल्स कंपन्यांचे टॉवर्स पन्हाळ्याचे

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१२७