शिक्षणाची नवी साधने
संगणकीय उपकरणं (लॅपटॉप, पामटॉप, आयपॉडस, इत्यादी) मोबाईल, उपग्रहीय फोन, व्हिडिओ / व्हर्म्युअल गेम्स, दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टीम्स, सीडीज, डिव्हीडीज, एलईडीज, रिमोट्स, मेसेजिंग मशीन्स व सॉफ्टवेअर्स, मल्टिमीडिया, थ्रीडीज, टच स्क्रीन, स्कॅनर्स, पेन ड्राइव्ह, डिश अँटेनाज ही नव्या शिक्षणाची साधनं राहणार असल्याने पाटी, पेन्सील, पुस्तके, दप्तर इतिहासजमा होऊन शाळा, वर्ग, शिक्षक सर्व आभासी (Virtual) असेल. सारं शिक्षण ज्ञानरंजक, स्वतःच्या सोयीनुसार घेता येईल. ते वेळापत्रक, परीक्षा, पेपर, मार्कमुक्त असेल.
तंत्रज्ञानी बालपिढी
गेल्या दशकात जन्मलेली व शाळेत जायला तयार असलेली किंवा प्राथमिक शाळेत नुकतीच गेलेली नवी बालपिढी ही तंत्रज्ञान कुशल आहे. खेड्यात काय नि शहरात काय, त्यांच्या आजूबाजूला इतकी यंत्रे वावरत आहेत, त्यामुळे ती जुन्या पिढीपेक्षा संगणक, मोबाईल, टी.व्ही., रिमोट गेम्स, व्हिडिओ गेम्स, इत्यादी वापरात पटाईत आहे. संगणक, टी.व्ही., मोबाईल, खेळणी इत्यादी सान्निध्यात त्यांचे सहा ते आठ तास दरदिवशी रमणे... यातून ही पिढी संगणक, मोबाईल, व्हिडिओसाक्षर झाली आहे. त्यांना आता पाटी, पुस्तके, पेन्सिलची गरज उरली नाही. ती सरळ संगणकाच्या पडद्यावर मुळाक्षरे काढतात. अंकज्ञान होते, रंगज्ञान होते. ती माऊसनं चित्रं काढतात, खोडतात, रंगवतातही, नवे रंग, आकार तयार करतात. संगणकावर रेस, चेस, क्रिकेट खेळतात. पत्ते, टेनिस, फायटिंग सारं बेमालूम करणारी बच्चे कंपनी वाचन, लेखन अंकज्ञान, अक्षरज्ञान, स्वाध्यायाने करतात. त्यांची आकलनशक्ती अफाट व कल्पनाशक्ती अचाट इतकी की, आई-वडील अडाणी व आजीआजोबा गये-बीते ठरत आहेत. नाद, ताल, संगीत, मोटारींची मॉडेल्स, वस्तूंच्या जाहिराती, कार्टून चॅनल्स, डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीनं त्यांना पर्यटन, पर्यावरण, परदेश, प्राणी, पक्षी, पाणी, पर्वत ‘समुद्र, धबधबे, युद्ध, विमान, कारखाने' इत्यादी सर्व शाळेत जाण्यापूर्वीच साक्षर केलं आहे. ते इतकं की, त्याच्या मानानं त्यांच्या शिक्षक, पालकांचे सामान्य ज्ञान फिके पडत आहे. हे वास्तव लक्षात घेतले की, आपल्या देशात त्यांना बालवाडी प्राथमिक, माध्यमिक, उच्च सर्व पातळ्यांवर दिले जाणारे शिक्षण त्यांच्या अनुभव व ज्ञानकक्षेच्या कितीतरी पट मागास, कालबाह्य व कुचकामी असलेलं आढळेल. शिवाय ते ज्या तंत्रज्ञानी पर्यावरणात वाढतात... घर...