पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या संदर्भात सहानुभूतिपूर्ण, संवेदनशील राष्ट्रीय धोरण निश्चितीची गरज आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विरुद्ध उच्च शिक्षण अशी झुंज लावून आपलं तथाकथित ग्रामीण विकासासंबंधीचं प्रेम व्यक्त करण्याचा खेळ काही नवा नाही. शिक्षण हा एक अखंड घटक आहे. शिक्षण म्हटले की, त्यात प्राथमिक ते उच्च सर्व स्तर अंतर्भूत होत असतात. ते सर्व घटक समाजविकासात परस्परपूरक भूमिका बजावित असतात. भारताला शिक्षणाच्या संदर्भात मोलाची भूमिका बजावायची असेल तर आणखी काही वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत; तरच आपणास विद्यार्थिसंख्या वाढ व गुणवत्ता संवर्धनाच्या संदर्भात काही यश हाती लागेल. त्यासाठी सट्टेबाजांच्या हाती शिक्षण सोपवणे म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी स्थिती होऊन बसेल. ज्या देशात अद्याप २६ टक्के जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते आहे, अशा भारतात शिक्षणाची खुली बाजारू व्यवस्था येथील क्रियाशील तरुणाईस शिक्षणासाठी आकर्षित करू शकणार नाही. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विकास आत्मघाती वळण घेतल्याशिवाय राहणार नाही. छोटे-छोटे व्यावसायिक पाठ्यक्रम कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे एकदम उगवतीलही; पण त्यामुळे स्थिर, सैद्धान्तिक मूलभूत शिक्षणालाच फाटा मिळेल. मूलभूत संशोधन थांबेल. त्याचा देशाच्या प्रगतीवर अनिष्ट व दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारांनी त्वरित सक्रिय हस्तक्षेप करायला हवा. उच्च शिक्षणाच्या सततच्या स्थिर विकासाची शाश्वती देणे आवश्यक नाही, तर अनिवार्य झालं आहे.
 शिक्षण नि त्यातही उच्च शिक्षण कधीच इथल्या राज्य सरकारांची पूर्ण जबाबदारी राहिलेली नाही. (शिक्षण समवर्ती सूचीत असल्याने) शासन व जनतेने नेहमीच खासगीकरणाचं स्वागत केलं आहे; पण पूर्वीच्या नि आजच्या खासगीकरणात फरक आहे. शिक्षणातील खासगीकरणाचे पूर्वीचे प्रयत्न हे अनुकरणीय व समाजहिताचे होते. सध्याचे प्रयत्न बाजारू आहेत. जगातील अन्य विकसित देशांपेक्षा भारतातील उच्च शिक्षणाच्या खासगीकरणाचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील ८० टक्के उच्च शिक्षण सार्वजनिक क्षेत्राकडे आहे. तिथे अवघे २० टक्के विद्यार्थी खासगी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात. आशिया खंडातील देशांत नेमकी उलटी स्थिती दिसून येते.

 खासगी क्षेत्राच्या मुक्त विकासातून जर स्वयंपूर्ण आर्थिक पाठ्यक्रम राबविले जाऊ लागले तर समाजात परत एकदा नवी विषय वर्गव्यवस्था प्रस्थापित होईल व ती कॅन्सरसारखी देशाला आतून पोखरून टाकल्याशिवाय

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१०८