पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामचे कार्य संस्कृति यांच्या उत्कर्षाचा काळच फार मोठा होता. महंमदाच्या मदिनेच्या विजयानंतर सुमारे शंभर वर्षेच बगदादमध्ये अबासादिसच्या स्थापनेपर्यंत लष्करी युग होते. त्यानंतर सर्व हालचाली विस्तृत अशा साम्राज्याच्या संरक्षणासाठीच होत्या. शांततेचीं सुखें कालांतराने समृद्धि होतांच अरबांची लढाईची तीव्रता कमी झाली होती. त्यांना युद्धांतील लुटीपेक्षां व्यापार आणि उद्योग यांतच संपत्ति मिळवावी असे वाटू लागले होते. शास्त्र व काव्य यांच्या क्षेत्रांत नामवंत होण्याची त्यांना इच्छा होऊं लागून त्यांचे मन रणबंध तोडू लागले होते. सामाजिक व व्यक्तिगत जीवनाच्या उपभोगांतच त्यांना महंमदाच्या आणि अल्लाच्या भक्तीपेक्षा अधिक सौख्य अनुभवास येऊ लागले होते. युद्धाची उत्कटता कमी झाली होती आणि पूर्वजांच्या पराक्रमाचे योगाने उत्पन्न झालेल्या शांत वातावरणाच्या आस्वादांत त्यांना आल्हाद वाटू लागला होता. अबूबकर आणि उमर यांच्या 'उंच्या झेंड्या' खालीं गोळा झालेल्या लोकांच्या वंशजांना व्यापार, आणि उद्योग हा लाभदायक व शास्त्र आणि तत्त्वज्ञान संतोषदायक वाटू लागले होते. 'धर्मयुद्धाचे' स्वरूपांत युरोपचे आक्रमण सुरू होईपर्यंत सुमारे तीनशे वर्षांपर्यंत शांति, प्रगति आणि सुस्थिति यांचा अंखड लाभ अरबांना मिळाला. मात्र या धर्मयुद्धांमुळे पुन्हां त्यांचे ते लष्करी तेज चेतविल्यासारखे झाले होते. मध्य आशियांतील रानटी मोगलांनीं अरबांचा पाडाव केल्यानंतर मग मुसलमानांच्या विजयाशीं लूटमार, क्रौर्य आणि दडपशाही निगडित झाली. दरबारी ऐषारामामुळे अरव संस्कृति आणि ज्ञान गढूळ झाले आणि इस्लामच्या क्रांतिकारक निशाणाचे पहिले तेज कमी होतांच त्याचा तुर्क आणि तार्तरी या दुष्ट लोकांनी दुरुपयोग केला. ४५