बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. मुहंमद जें बोलत तें ऐकणारा कधीं विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणारावर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळां ते अशान्त, सचिन्त, कष्टी असे असत. गळून गेलेले असे दिसत. निरुत्साही दिसत. परंतु एकदम कोठून तरी त्यांना स्फूर्ति येई. उत्साह संचरे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हंसूंबोलूं लागत.
आणि लहान मुलें म्हणजे त्यांचा प्राण! ही भावी पिढी जणुं ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील. त्यांना लहान लहान गोष्टी सांगतील. त्यांच्या बरोबर दऱ्याखोऱ्यांतून, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील. ख्रिस्तहि लहान मुलांचा असाच शोकी होता. मुले म्हणजे देवाची प्रभा!
या पंधरा वर्षांच्या काळांत अंतःपरीक्षण चाललें होतें. श्रद्धा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिद्धता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
अब्दुल मुत्तलिब मेल्यापासून मक्केत एकजूट राहिली नव्हती. जे शहरचे खरे नागरिक त्यांना एकरक्तत्वामुळे संरक्षण असे. परंतु परकीयांचे जीवन मक्केंत सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. मुहंमदांस हा अन्याय पहावेना. 'हल्फ-उल्-फझूल' नांवाची त्यांनी एक संस्था स्थापिली. प्राचीन काळी अशी एक संस्था होती. तिच्यांत फझल, फझाल, मुफ्फझल, फुझेल असे चार लोक होते. त्यांच्या संघास फझल म्हणत. त्या प्राचीन संस्थेचे मुहंमदांनी पुनरुज्जीवन केलें. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसानी इ. स. ५९५ मध्ये ही संस्था त्यांनीं स्थापिली. मुहंमद या संस्थेचे मुख्य होते. हाशिब व मुत्तलिब यांच्या घराण्यांतील सारे या संस्थेत सामील होते. या संस्थेच्या दबदब्यामुळे दुबळ्यांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेने जरा धमकी देतांच काम होत असे. धटिंगणांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढें इस्लामच्या अर्ध्या शतकापर्यंत, सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.
■ ■ ■
इस्लामी संस्कृति । ४९