Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महान् ऐक्यबंधन असे. बेदुइनांचीं अनेक कुळें झालीं होतीं. अनेक कुळांच्या निरनिराळ्या जाति झाल्या होत्या. आपल्या कुळाचे व आपल्या जमातीचें बळ कमी होऊं नये म्हणून ते फार जपत. माझ्या कुटुंबांतील एखादा मारला गेला तर माझे बळ कमी होऊन शत्रूचें वाढणार नाही का? म्हणून बदला घेतलाच पाहिजे. बेरीज वजाबाकी सारी झाली पाहिजे! या वृत्तीमुळे वांशिक भांडणे, द्वेषमत्सर सदैव असत. हीं भांडणें थांबविणे कठिण जाई. कारण आपापल्या जातीचा व कुळाचा त्यांत अभिमान असे. कोणा एकाला इजा झाली, अपाय झाला तर सारी जमात सूड घ्यावयास उठे. जमातींतील कोणी एकानें अपराध केला असला तरी सारी जमात त्याची जबाबदारी घेई. एरव्हीं मित्रत्वाने राहणाऱ्या या जातिजमातींत कधी कुठे लहानशीं ठिणगी पडेल व वणवे पेटतील त्याचा नेम नसे. परंतु आप्तेष्ट होतां होईतों एकमेकांवर उठत नसत. जवळच्या नातलग कुळांपासून अपाय झाले तरी सोशित. "तेहि आमचेच भाऊ. चांगल्या मार्गावर येतील. सद्बुद्धि येईल. पूर्वी चांगले वागत तसे पुन्हां वागू लागतील" असें म्हणत. जातीसाठी दारिद्र्य पत्करणं, मरण पत्करणे, याचा अभिमान बाळगीत.
 त्यांच्या त्यांच्या जातिजमातीचा पुढारी असे. त्याचे म्हणणे सारे मानीत. परंतु हे संबंध मोकळे असत. त्यांत दास्याची यत्किंचितहि छटा नसे. एक तर अरब फार श्रीमंत नसत. एकानें मरावें व दुसऱ्यानें सुखांत लोळावे इतकी विषमता त्यांच्यांत नव्हती. त्यांच्यांतील श्रीमंत म्हटला म्हणजे त्याचा तंबू जरा नीटनेटका असे, पागोटें जरा नीटनेटके असे, त्याचा एखादा सुंदर उमदा घोडा असे. परंतु समाजावर आपली सत्ता लादील इतकी श्रीमंती कोणाची नसे. त्याच्यापासून समाजाला धोका नसे. पुढाऱ्यांत व त्यांच्यांत जो संबंध असे तो सन्मान्य असे. शेजाऱ्याजवळ, मित्राजवळ जितक्या मोकळेपणाने बोलावें तितक्या मोकळेपणानें तो आपल्या नेत्या जवळहि बोले. शेजाऱ्याची जशी भीति वाटत नसे तशी पुढाऱ्याचीहि. बेदुइनाची ही जी स्वतंत्र वृत्ति ती पस्थितिजन्य होती. एका कवीनें म्हटलें आहे-
 "स्वातंत्र्य हें पहाडांवर फुलतें. समुद्रावार फुलतें," आपण त्यांत वाळवंटेंहि घालू. वाळवंटांतहि ते फुलतें. अरबस्थानांत जीवनक्रमहि इतका तीव्र असे कीं

इस्लामी संस्कृति । ११