सचिंत करीत नसे. दुःखचितांचे ढग त्यामुळे मनांत नसत जमत. त्याचें तें वाळवंटांतील जीवन, परंतु ते एक प्रकारें परिपूर्ण असे. उत्साही, संस्फूर्त व सामर्थ्यसंपन्न असें असे. त्याचें तें जीवन वासनाविकारांचे असे. परंतु त्यांतहि एक प्रकारची आनंदी व समाधानी वृत्ति त्याची असे. जीवन हे जगण्यालायक आहे अशी त्याची निःसंदिग्ध खात्री असे.
अशा ह्या त्याच्या जीवनांतहि ध्येय असे. वाळवंटाचा तो अस्सल पुत्र. तो एखाद्या पुढे आलेल्या डोंगराच्या टोकाखाली छायेत पडून नसे रहात. तो शूर, साहसी, अतिथ्यशील असा असे. स्त्रियांच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध असे. आपल्या जातिजमातीसाठी स्वतःचे सर्वस्व द्यावयास तो तयार असे. निराश्रितांस आश्रय द्यावयास, गरजवंतास साहाय्य करावयास तयार असे. त्याची वाणी मोठी गोड, वक्तृत्वपूर्ण व अस्खलित अशी असे.
या अरबांची संस्कृति भटकी होणे अपरिहार्य होतें. लोकसंख्या वाढे, परंतु झरे थोडेच वाढत. भटकें जीवन त्यांच्यावर लादले जाई. निसर्गाशी झगडणाऱ्या या लोकांत कांहीं सामाजिक व कांहीं वैयक्तिक गुण आले. संकटांशीं सदैव झगडायचें असे. त्यामुळे त्यांच्यांत ऐक्य असे. मालमत्ता व प्राण नेहमींच धोक्यांत. नेहमीच असुरक्षितता. यामुळे ही एकजूट अवश्य असे. परिस्थितीशीं तोंड देण्यासाठी ऐक्यानें वागणे भाग पडे. परंतु हें एकटें त्या त्या जातिजमाती पुरतें असे. इतरांचा त्यांना विश्वास नसे. जो आपल्या जथ्यांत नाहीं त्याचा भरंवसा कसा धरावा? त्यांचा देशाभिमान म्हणजे विशिष्ट जातिजमातीचा अभिमान. त्यांच्या सामाजिक जीवनाचा आदि व अंत म्हणजे त्याचा जथा! परंतु या गोष्टीचा विकास होऊं लागला म्हणजे अनेक चमत्कार होतात. भाऊ भावाशी भांडतो, परंतु भावासाठीं इतर सर्वाशीहि भांडावयास तो उठतो. शेजाऱ्याजवळ भांडेल, परंतु शेजाऱ्यासाठीं साऱ्या जगाजवळहि भांडेल. यामुळे अरबांत एक प्रकारचें बळकट अभेद्य कवचहि होतें, ऐक्याचे कवच! भांडणांतहि ऐक्य होते. ते एकमेकांजवळ भांडत, एकमेकांसाठी प्राण द्यायलाहि सिद्ध असत! यामुळे न कळत देशाभिमान त्यांच्या अंगी आला. तो त्यांना माहीत नव्हता. मुहंमदांनी त्याची त्यांना जाणीव करून दिली. अरबाच्या वैयक्तिक जीवनांतहि सामुदायिक जीवनाला महत्त्व होते. आपल्या जातिजमातीशीं निष्ठावंत राहणें हें
१० ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/२४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
