हा दांभिकपणाचा आरोप जसा मिथ्या आहे त्याप्रमाणेच रंगेलपणाचा. रंगेला रसूल, अशी चोपडीहि त्यांच्यावर लिहिली गेली. परधर्माचा अभ्यास करण्याची ही रीत नव्हे. रंगेल्यांच्या पाठीमागें कोट्यवधि लोक शेकडो वर्षे गेले नसते. दुसऱ्याच्या धर्माविषयी अभ्यास करतांना अत्यंत आपुलकीची भावना हवी.
कुराणांत पैगंबरांनी चार बायका करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शेवटी तर एकच बरी असेंहि मत दिले आहे. शिवाय सर्व बायकांना समतेनें नसेल वागवतां येणार तर अधिक बायका करूं नकोस, असेंहि त्यांनी सांगितले आहे. अरबस्थानांत किती बायका कराव्या याला सुमारच नसे. मुहंमदांनी त्याला बंधन घातलें. कांहीं मर्यादा घातली. तेथें एकदम एकपत्नीव्रत सांगते तर कोणी ऐकतेहि ना.
टीकाकार व निंदक म्हणतात, "पैगंबरांनी इतरांना चारच बायका ठेवल्या. स्वतः मात्र किती तरी केल्या!" एक गोष्ट आधी लक्षांत ठेवली पाहिजे की कुराणांतील चार पत्नींची मर्यादा सांगणारे वचन त्यांच्या मुखावाटे बाहेर पडण्यापूर्वी त्यांचीं सारीं लग्ने झाली होतीं, त्या वचनानंतर नव्हत. ज्यांना त्यांनी चारच बायकांची परवानगी दिली, ते काडीमोड करूं शकत असत. आणि पुनः- पुन्हां अनेक लग्न करू शकत असत. मुहंमदांनी कधीं काडीमोड केली नाहीं. परंतु मुख्य गोष्ट आहे ती ही की मुहंमदांनी केलेली लग्ने ही विषयसुखार्थ नव्हतीं, विलासार्थ नव्हती. अनेक कारणांमुळे तीं त्यांना करावी लागली. त्या लग्नांचे इतिहास पहाल तर त्या लग्नांतून विलासिता न दिसतां मुहंमदांची त्यागता व उदात्तताच दिसेल. आणि पहिली पत्नी- ती थोर खदिजा, ती जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत पैगंबरांनी कधीहि लग्न केलें नाहीं. यावरून त्यांची दृष्टि दिसते. ते केवळ भोगी असते तर खदिजा मरण्यापूर्वीहि सुंदर बायको करते. खदिजा वृद्ध झाली होती. ती त्यांच्यापेक्षां वयानें मोठी होती. तरी तिच्याशी निष्ठावंत राहिले. खदिजा ६५ वर्षांची होऊन मरण पावली. तिच्या मरणानंतरची पैगंबरांची सारी लग्नें! सौदेजवळ त्यांनी लग्न केलें. ती एक विधवा होती. तिचा नवरा मुस्लिम झाला होता. तो अबिसीनियांत त्यांच्याबरोबर गेला होता. तो तिकडेच निर्वासित असतां मरण पावला. पत्नी निराधार. मुहंमद तिचा सांभाळ कसा करूं शकते? तिच्या पतीनें नवधर्मार्थ सर्वस्व दिलें होतें. ती अनाथ
१५४ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१७१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
