Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची शिकवण आहे. अर्थात् मांसाशन त्यागाचा प्रयोग त्यांनी केला नाहीं. उंट, शेळ्या मेंढ्या हें देवाने दिलेले अन्न आहे असे ते म्हणत. अरबस्थान ओसाड भूमि. तेथें दाणापाणी नाहीं. तेथें दुसरें खाद्य कोणते? हिंदुस्थानासारख्या सुपीक भूमींतच मांसाशनत्यागाचा प्रयोग शक्य. तोहि संपूर्ण यशस्वी झाला नाहीं. बंगालमध्ये ब्राह्मणहि मासे खातात. एकदा पूज्य विनोबाजींस धुळे तुरुंगांत एकानें म्हटलें, "बंगाली लोक तर मासे खातात!" विनोबाजी म्हणाले, "बंगालची हवा अशी आहे की पोटांत कांहीं तरी माशासारखा पदार्थ गेल्या शिवाय लोक जिवंतच रहाणार नाहींत. सर्वत्र प्रचंड नद्या. गरीब लोकांना पाण्यांत जणुं रहावें लागतें. मलेरिया, डांस. अशा सर्द हवेंत अंगांत उष्णता रहाण्यासाठी मासे न खातील तर काय करतील. माशांऐवजी अमुक एक वनस्पत्याहार केला तर तोच परिणाम होईल, असें कोणी प्रयोगानें जोपर्यंत दाखवीत नाहीं आणि तो आहार सर्वांना, गोरगरिबांना परवडेल व मिळेल असे जोपर्यंत दाखवीत नाहीं, तोपर्यंत बंगाल्यास नावें नका ठेवू. त्यांना मासे खाऊं दे व भरपूर काम करूं दे. देशसेवा करूं दे." आणि एका प्रख्यात चिनी लेखकानें चीनच्या सर्वभक्षत्वाविषयीं लिहितांना म्हटले आहे, "चीनमधील अपरंपार लोकसंख्या, सदैव येणारे पूर, येणारे दुष्काळ, होणारी वादळें, नद्यांचे बदलणारे प्रवाह, हें सर्व ध्यानांत घ्या व मग चिनींच्या खाण्यावर टीका करा."
 पैगंबर शक्य ते सांगत. अशक्य ध्येये त्यांनी दिलीं नाहींत. यात्रेच्या वेळेस उंट मारतात. परंतु पैगंबरांनी स्वच्छ सांगितले आहे की उंटाचें रक्त देवाला मिळत नसतें. देव सत्कर्मे बघतो. मग त्यांनीं तीं चालू कां ठेविली? त्यामुळे गरिबांना जेवण मिळतें. पोटभर मेजवानी मिळते. पशूंच्या बलिदानानें स्वर्गप्राप्ति, प्रभुप्राप्ति त्यांनी कधीं सांगितली नाहीं. "हत्या करण्यापूर्वीहि देवाचें नांव घ्या. शस्त्र तीक्ष्ण असू दे. हाल करूं नका." असें मुहंमदांनी सांगितले आहे. भक्षणार्थ हिंसा 'मुभा' असे कुराणी धर्म मानतो.
 पशुपक्ष्यांविषयीं त्यांना प्रेम वाटे. एकाने घरट्यांतून पिलें चोरून आणिली. ती पक्षीण घिरट्या घालीत येत होती. तो गृहस्थ पिले घेऊन, मुहंमदाकडे आला. पैगंबर म्हणाले, "तीं पिले त्या चादरीवर ठेव." त्याने तसे केलें. ती पक्षीण प्रेमानें झळबूंन तेथे एकदम आली. पैगंबर म्हणाले, "पहा हें प्रेम. ईश्वराचें याहूनहि अधिक प्रेम सर्वांवर आहे. जा, हीं पिलें पुन्हां त्या घरट्यांत नेवून ठेव."
१५० ।