पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७६ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

दरबाराकडून हें काम करून घेतलें.* आजरें महालाच्या एकतर्फ ३१ खेड्यांची सनद शंभु छत्रपतींनीं अनूबाई ह्यांच्या नांवें नवीन करून दिली. अनूबाईचे सरदार हरिराम यांस शंभूछत्रपतींनी ह्याच सुमारास हेरवाड हा गांव इनाम दिला तेंही पेशवे छत्रपतींच्या मिलाफाचेंच फल होय.
 या उत्तम संधीपासून अनूबाईस एवढाच फायदा झाला असें नाहीं. गत वर्षी संभाजी महाराजांनी भाऊसाहेबांस पेशवाई देऊं केली तेव्हां त्या पदाची जहागीर म्हणून भीमगड, पारगड, व वल्लभगड हे तीन किले त्यांच्या त्यांच्या घेऱ्यातल्या खेडयांसुद्धां देऊं केले होते. हल्लींच्या प्रसंगीं नानासाहेबांनीं महाराजांस विनंती करून ती जहागीर आपणाकरितां मागून घेतली व तिची मामलत अनूबाईस सांगितली.
 या भेटीच्या समारंभात जें काय दिलें तें सर्व करवीरकरांनींच दिलें. पेशव्यांनी मोबदला त्यांस कांहीं दिल्याचें दिसत नाहीं. या गोष्टीवरून सुद्धां " तुमचें राज्य तुम्हांकडे दत्तक देऊनसुद्धां निर्वेध चालवूं " असे आश्वासन पेशव्यांनी संभाजीमहाराजांस दिलें असलें पाहिजे हेंच अनुमान निःसंशय निघतें.
 या वर्षी राणोजी घोरपडे यांनीं नारायणरावतात्यांस गवसें हा गांव इनाम दिला. सेनापतींचा व करवीर दरबाराचा नित्य कलह सुरू असे व त्यांत सेनापतीच्या बाजूस अनूबाईकडून द्रव्याच्या व फौजेच्या रूपानें हमेषा कुमक होत असे व तसा प्रसंग आल्यास पेशव्यांकडून कुमक मिळावी म्हणून सेनापतींस वशिला अनुबाईंचाच


*असली ही शास्त्रार्थाकरितां घ्यावयाची सनद जो तो आपल्या सोईप्रमाणें घेणार हें उघड आहे. कुरुंदवाडकरांस कापशीकरांकडून कुरुंदवाड स. १७३६ त इनाम मिळालें त्याची सनद त्यानीं करवीरच्या छत्रपतींकडून स० १७८४ त करून घेतली !